देहूगाव, -आम्ही ज्याचे दास। त्याचा पंढरीये वास ।। या अभंगाचे स्मरण करत तीर्थक्षेत्र देहूतून तुकोबारायांची पालखी घेऊन पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी लाखो भाविकांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येने राज्याच्या काना-कोपऱ्यातून वैष्णवांचे मेळे देहूनगरीत दाखल होत होते. विविध धार्मिक कार्यक्रम, हरिनाम, टाळ-मृदंगाच्या गजराने देहूनगरी दुमदुमली अन् पालखी सोहळ्यास शनिवारी प्रारंभ झाला.
पालखी सोहळ्याची परंपरा जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे सुपुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी 1685 मध्ये सुरू केली. वारीचे हे 338 वे वर्ष आहे. यंदाच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटेपासूनच वारकऱ्यांची लगबग सुरू होती. पहाटेच्या वेळी इंद्रायणी नदी घाटावर स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पहाटेपासूनच मुख्य मंदिर, जन्मस्थान व वैकुंठस्थान मंदिरात दर्शनार्थ भाविकांनी लांबपर्यंत रांगा लावल्या होत्या.
तुकाराम… तुकारामऽऽऽ
असा नामघोष करत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीने शनिवारी (दि. 10) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास टाळ, मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात तीर्थक्षेत्र देहूतील मुख्य मंदिराच्या भजनी मंडपामध्ये प्रस्थान ठेवले.
या वेळी उपजिल्हाधिकारी संजय असवले, तहसीलदार डॉ. अर्चना निकम, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, देहू नगरपंचायतीचे नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्षा शीतल हगवणे, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, मंडलाधिकारी ज्योती भुजबळ यांसह नगरसेवक, ग्रामस्थ आणि राज्यभरातील वारकरी उपस्थित होते.
“पुंडलिका वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम…’
नामाचा जयघोष केला. पालखी मंदिरातून बाहेर आणली. सायंकाळी सहाच्या सुमारास पालखी मंदिर प्रदक्षिणानंतर मंदिराच्या बाहेर पडली. अग्रभागी दोन अश्व, विणेकरी, टाळकरी, पखवाज वादक, दिंडीकरी, भाविक, वारकरी आदी सोहळ्यात सहभागी झाले होते. पालखी सोहळा देहूतील इनामदार वाड्यातील पहिल्या मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास पालखी इनामदार वाड्यात विसावली.
इनामदार वाड्यात मुक्काम
इनामदार वाड्यात रात्री म्हातारबुवा खणेपुरीकर दिंडीचे कीर्तन झाले. त्यानंतर पहाटेपर्यंत वेणुरकर दिंडीचा जागर सुरू होता. शासकीय महापूजेनंतर इनामदार वाड्यातून पालखी सोहळा रविवारी (आज) सकाळी अकराच्या सुमारास पंढरपूरकडे मार्गस्थ होईल आणि दुसऱ्या मुक्कामासाठी पालखी सोहळा रविवारी रात्री आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात पोहचेल.
काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता
पालखी सोहळ्यानिमित्त सुरू असलेले अखंङ हरिनाम सप्ताहाची सांगता शनिवारी काल्याच्या कीर्तनाने झाली.
सकाळी 10 ते 12 वेळेत हभप पुंडलिक महाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. सकाळी 11 वाजता घोडेकर सराफ यांच्याकडून चकाकी करण्यात आलेल्या संत तुकोबांच्या पादुका परंपरागत मान असणाऱ्या म्हसलेकर कुटुंबीयांतील सतीश नारायण सोळंके यांनी डोक्यावर घेऊन टाळ मृदंग आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम…जयघोषात दिंड्यांच्या लवाजमात इनामदार वाड्यात आणल्या. हभप दिलीप महाराज गोसावी यांच्या हस्ते पादुकांचे पूजन झाले. यावेळी टाळ-मृदंगाचा अखंड नाद सुरू होता.
ठेव माझा मिराशी । ठाव तुझे पायापाशी।।
याचा धरीन अभिमान । करीन आपुले जतन ।।
हा अभंग म्हणून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या आरतीने सोहळ्याची सांगता झाली. यावेळी “यावेळी बोला…पुंडलिक वरदे हरि विठ्ठल…’ चा गजर झाला.