राहाता – बंद पडलेला गणेश कारखाना सुरू करण्याचे दायित्व आपण दाखवले. भविष्यातही कारखाना चांगला चालण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. पण आज निवडणुकीनिमित्त एकत्रित आलेले कारखाना कोण चालवणार हे सांगायला तयार नाहीत. आज कारखान्याच्या निमित्ताने तुमच्यासमोर येणारे गणेश कारखाना म्हणजे सहकाराला झालेला कॅन्सर असल्याचे म्हणत होते, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.
शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून मंत्री विखे पाटील यांनी तालुक्यातील रामपूरवाडी, न.पा.वाडी, शिंगवे येथे नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच शासकीय योजनांची माहिती दिली. तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी पठारे, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, जलसंपदा विभागाचे महेश गायकवाड, बांधकाम विभागाचे अभियंता धापटकर आदी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, संपूर्ण राज्यात शासन आपल्या दारी उपक्रम सुरू आहे. याचा उद्देश फक्त लोकांची शासन दरबारी अडकलेली काम मार्गी लागावी हाच आहे. या उपक्रमातून सरकार आणि सामान्य नागरीक यांच्यातील दरी कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागच्या सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती, पण अंमलबजावणी केली नाही. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहे.
ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही त्यांच्या कागदपत्रातील त्रुटी अधिकाऱ्यांनी दूर करून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या. महसूल विभागाच्या माध्यमातून वाळूचे सर्वंकष धोरण कार्यान्वित झाले. आता रात्रीची वाळू वाहतूक बंद झाली. दिवसा कायदेशीरपणे वाळू वाहतूक सुरू आहे.ट्रॅक्टरमधून वाळू वाहतुकीला परवानगी दिल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. शासन योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता अधिकाऱ्यांनी सुद्धा लोकांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन मंत्री विखे यांनी केले.
मोजणीचा अर्ज पंधरा दिवसांत निकाली
तालुक्यातील बहुतांशी गावांतील मोजणीचे प्रकरणे मार्गी लागत आहेत. जूनपर्यंत प्रलंबित प्रकरणे मार्गी लागतील. रोव्हर तंत्रज्ञानाची मोठी मदत यासाठी झाली. भविष्यात मोजणीचा अर्ज दाखल झाल्यापासून पंधरा दिवसांत निकाली काढण्यासाठीचे धोरण घेण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.