वाघोली (पुणे) – करोना रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार मोलाची कामगिरी करत आहे. करोनाने ग्रस्त असलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. आरोग्य सुविधा तातडीने मिळवून देण्याची मागणी व नागरीकांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे यांनी व्यक्त केले.
रेमडेसिविरबाबत योग्य निर्णय होऊन देखील हॉस्पिटलकडे इंजेक्शनचा साठा उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होत आहेत. राज्यात शहरी व ग्रामीण भागात इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. करोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबाला या कठीण काळात वणवण फिरावे लागत आहे. शासनाने तातडीने याबाबत लक्ष द्यावे व मदत करावी. तसेच प्रत्येक जिल्ह्यात कोविडची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन व्हेंटिलेटर वाढवून मिळावेत.
जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी भर द्यावा तसेच जास्तीत जास्त कोविड सेंटरची उभारणी करून नागरिकांना आरोग्य सुविधा मिळवून देण्याची मागणी काकडे यांनी केली आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे नागरिकांचे जीव वाचवण्यासाठीचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. केवळ आरोग्य सुविधांच्या अभावी जीवघेणे प्रसंग नागरिकांवर येऊ नयेत, यासाठी शासनाने आरोग्य सुविधा तातडीने मिळवून देण्याची तसेच सक्षम करण्याची गरज असल्याचे काकडे यांनी यावेळी सांगितले.