नगर – जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून मागणीनुसार निधी देण्यात येतो.या निधीचा विनियोग करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे करावीत. तसेच चालू वर्षात मंजूर असलेल्या निधीसाठीचे प्रस्ताव येत्या महिन्याभराच्या आत सादर करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री विखे पाटील बोलत होते.बैठकीला खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा. राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, चालू वर्षामध्ये जिल्ह्यासाठी 557 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जिल्ह्यातील विकास कामांवर संपूर्णपणे खर्च होईल, यादृष्टीने सर्व यंत्रणांनी नियोजन करावे. गत वर्षातील निधी खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्रेही तातडीने सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. लम्पी आजाराचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होऊ नये, यादृष्टीने पशुसंवर्धन विभागाला पुरेशा प्रमाणात औषधी, लस तसेच मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
उपलब्ध संसाधनांचा उपयोग करीत जिल्ह्यात लम्पी आजारांमुळे पशुधनाची हानी होणार नाही, यादृष्टीने विभागाने प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देशही दिले. शेतीला विद्युत मोटारीच्या सहाय्याने मुबलक प्रमाणात पाणी मिळावे, यासाठी ग्रामीण भागामध्ये मुबलक व योग्य दाबाने वीजेचा पुरवठा व्हावा, यादृष्टीने नियोजन करत वीजेच्या बाबतीमध्ये ग्रामस्थांची तक्रार येणार नाही, याची काळजी घेण्याच्या सुचना करीत सुलभरितीने वीजेच्या पुरवठ्यासाठी खराब झालेल्या विद्युत तारा, जीर्ण झालेले कंडक्टर आदींची दुरुस्ती करुन घेत सोलर पॉवरच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.