हैदराबाद,कोलकाता, चेन्नई – केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकार विरोधात प्रादेशिक पक्षांचा आणि समानतेच्या विचारधारेवर श्रध्दा असणाऱ्या पक्षांचा विरोध वाढत आहे. त्यातूण तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यातून 2024च्या लोकसभा निवडणुकांची चाहूल लागली आहे.
भारतीय जनता पक्षाला सत्तेतून हटवून बंगालच्या खाडीत फेकून देण्याची गरज असल्याचे मत तेलंगणाचे मुख्यमंत्री वायएसआर चंद्रशेखर रेड्डी यांनी व्यक्त केले. त्यासाठी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. मुंबईत ही भेट होईल. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या महितीला दुजोरा दिला. या भेटीमुळे मोदीविरोधातील प्रादेशिक पक्षांच्या एकजुटीच्या मुद्द्याला वेग येण्याची शक्यता आहे
तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचे आवाहन केले. जर आपण 34 वर्षाच्या सत्तेनंतर कम्युनिस्टांना प. बंगालमधून हद्दपार करू शकत असू. तर, आपण भाजपाला देशातून हद्दपार करू शकतो, असे त्या म्हणाल्या. भाजपा विरोधी शक्तींनी एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, त्यात काही जण खोडा घालत आहेत. त्यांचा उर्मटपणा कमी होत नाही. त्यामुळे आपल्याला वेगळा मार्ग निवडावा लागेल. भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी प्रादेशिक पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. कॉंग्रेस जशी उत्तर प्रदेशमधून राष्ट्रीय पक्ष बनला. भाजप गुजरातमधून राष्ट्रीय पक्ष बनला तसेच तृणमूल बंगालमधून राष्ट्रीय पक्ष बनेल.
देशाला कट्टरता आणि धार्मिक विद्वेषाचा धोका आहे. या शक्तींविरोधात लढण्यासाठी समानता, आत्मसन्मान आणि सामाजिक न्यायावर विश्वास असणाऱ्यांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. ले. स्टॅलीन यांनी केले. या संदर्भात त्यांनी देशातील सर्व पक्षांच्या सुमारे 35 नेत्यांना पत्र लिहून प्रजाकसत्ताक दिनी स्थापन केलेल्या ऑल इंडिया फेडरेशन फॉर सोशल जस्टीस या संस्थेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सोनिया गांधी, लालू प्रसाद यादव, फारूक अब्दुल्ला, ममता बॅनर्जी, डी. राजा, सिताराम येचुरी, एन. चंद्राबाबू नायडू, अरविंद केजरीवाल, मेहबुबा मुफ्ती, चंद्रशेखर राव, उध्दव ठाकरे आणि अखिलेश यादव यांचा समावेश आहे. अण्णाद्रमुकचे समन्वयक ओ पनीरसेल्वम, पीएमकेचे संस्थापक एस. रामदास, व्हीसीके नेते थोल थिरूमवलन आणि वैको या तामिळनाडूतील नेत्यांनाही पत्र पाठवले आहे.