मुंबई – बोगस टीआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांनी आज दुसरे आरोपपत्र दाखल केले असून त्यात रिपब्लीक टीव्हीचा प्रमुख अर्णव गोस्वामी याचे नाव आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांच्या क्राईम इंटेलिजन्स ब्युरोने या प्रकरणाचा तपास करून मॅजिस्ट्रेट कोर्टात हे आरोपपत्र दाखल केले आहे. गोस्वामी याच्याबरोबरच एआरजी आऊटिलियरवरही आरोप ठेवण्यात आले आहेत. रिपब्लीक टीव्ही हा अर्णव गोस्वामी याच्या मालकीचा टीव्ही चॅनेल आहे.
या वृत्तवाहिनीने टीआरपी मोजणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून आपल्या वाहिनीचा टीआरपी बोगस पद्धतीने वाढवून घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अर्णव गोस्वामी याला अटकही करण्यात आली होती. त्याला त्याच्या निवासस्थानातून मुंबई पोलिसांनी उचलबांगडी करून अटक केली होती. हे प्रकरण देशभर बरेच गाजले होते.