संदीप राक्षे
सातारा – शहरातील मोती चौक परिसरातील व्यापारी पेठ पार्किंगच्या समस्येने बेजार झाली आहे. पालिका प्रशासनाच्या कृपेने रस्त्यावरील फूटपाथ बेपत्ता आहेत. त्यावरील अतिक्रमणावर कुणाचेच नियंत्रण नाही.वाहनांच्या पार्किंगसाठी योग्य जागा मिळत नसल्यामुळे ग्राहकवर्ग त्रस्त आहेच. त्याचबरोबर व्यापारीवर्गाच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम होत आहे. या परिसरातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवसे अधिक जटील होत चालला आहे. व्यापारउदिमाला उर्जितावस्था लाभायची असेल तर हा प्रश्न नियोजनबद्धरित्या मार्गी लावण्याशिवाय पर्याय नाही, असे मत व्यक्त होत आहे.
सदाशिव पेठेच्या अंर्तगत वर्दळीचा कर्मवीर भाऊराव पाटील पथावर खरेदी व कामासाठी येणाऱ्या ग्राहकाला वाहन लावणे सहजशक्य होत नाही. परिणामी दूर कुठेतरी वाहन लावून इच्छित दुकानात जाण्याची कसरत त्याला करावी लागते. आधीच अरुंद रस्ता, रस्त्यावर वाहनांचे दाटीवाटीने पार्किंग, गर्दी आणि फुटपाथवर पसरलेली सामानांची, हातगाड्यांची रेलचेल यामुळे वाहनांना जागा मिळणे दुरापास्त झाले आहे. गर्दी कोंडलेला झारीचा बोळ, व्यापाऱ्यांच्या दुकानासमोरील वाट अडविणाऱ्या लोखंडी जाळ्या, मोती चौक ते शनिवार चौक (501 पाटी) या मार्गावरील वाहतुकीला मोकळा श्वास घेणे जड झाले आहे. पार्किंग जागा गिळालेल्या इमारतींच्या प्रश्नामुळेच वाहने रस्त्यावर येऊन व्यापारी पेठेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
खण आळीमध्ये डोकावल्यास पार्किंग क्षेत्र वगळल्यास वाहतुकीसाठी केवळ पाच फुटाचा रस्ता उरला आहे. नो एण्ट्रीमध्ये घुसणाऱ्या वाहनचालकांमुळे हमखास वाहतुकीची कोंडी होते. व्यापारी पेठेतील काही पदपथ किरकोळ विक्रेते, कारागिरांनी पोटभाडेकरू म्हणून बळकावले आहेत. फूटपाथवरच प्लॅस्टिक विक्रीचे सामान ठेवल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर यावे लागते. काही ठिकाणी विक्रीसाठी मांडलेल्या केरसुणींमुळे पादचाऱ्यांना तेथील बोळातून चालणे मुष्किल आहे. पंचमुखी गणपती मंदिरासमोर पाच पाच फूट जागा व्यापणारे पाच सहा हातगाडीवाले सौदर्य प्रसाधनांची पथारी मांडून बसतात.
राजपथावरून खण आळीमध्ये येतानासुद्धा लिंबू सरबत अथवा बर्फ गोळा विकणाऱ्यांनी रस्त्याचे प्रवेशद्वार अडविलेले असते. खण आळीमध्ये कोणत्याच इमारतीला पार्किग नसल्याचा ठपका सातारा पालिकेच्या नगर विकास विभागावर पडला आहे. पार्किंग नसणारे इमारतीचे आराखडे मंजूर होतात कसे, असा प्रश्न असून नगर विकास नियोजनाची ऐशीतैशी करून “सब चलता है’ म्हणणाऱ्यांची प्रवृत्ती बोकाळली आहे. एकेकाळी छत्रपती शाहू महाराज आणि प्रतापसिंह महाराज (थोरले) यांनी वसविलेली शाहूनगरी हे भारतातील सुनियोजित राजधानी अशा लौकिकास प्राप्त होती. मात्र, या ऐतिहासिक शहराला अतिक्रमण करण्याच्या प्रवृत्तींनी बकाल करून टाकले. (क्रमश:)
नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने वेळोवेळी कारवाया कराव्यात आणि वर्दळीच्या चौकांमध्ये पोलिसांनी सातत्याने वाहतुकीचे नियमन करणे गरजेचे आहे. पंचमुखी गणेश ते खंडाळी कॉर्नर या दरम्यान सात ते आठ हातगाड्या असल्यामुळे साधारण दीडशे ते दोनशे फूट रस्ता अडविला जातो. परिणामी 50 फुटांचा रस्ता 40 फुटांचा होतो. रस्त्याच्या एका बाजूला केरसुणी विक्रेते व दुसऱ्या बाजूला हातगाड्या, त्यातच वाहनांचे पार्किंग यामुळे वाहतूक समस्या अधिकच जटिल होऊन गेली आहे. येथील मोकळ्या जागा शोधून पालिकेने व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना ही सुविधा दिल्यास व्यापारी पेठेतील पार्किंग व अतिक्रमणाची समस्या सुटण्यास मदत होईल. वाहतूक विभागाने, सातारा पालिकेच्या शहर विकास यंत्रणेने या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन या प्रश्नांची तड लावणे आवश्यक आहे. प्रसंगी व्यापारीसुद्धा या समस्येच्या निराकरणासाठी सहकार्य करतील.
– प्रमोद बेनकर (अध्यक्ष, सातारा शहर सराफ असोसिएशन)