कोलकता – पश्चिम बंगालमधील भाजपचे आमदार सोमेन रॉय यांनी शनिवारी सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसमध्ये वापसी केली. बंगाल निवडणूक निकालानंतर स्वगृही परतणारे ते चौथे आमदार ठरले. त्यामुळे त्या राज्यात भाजपला लागलेले गळतीसत्र सुरूच राहिले आहे.
बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल मेमध्ये जाहीर झाला. त्या निवडणुकीत बाजी मारून तृणमूलने सलग तिसऱ्यांदा त्या राज्याची सत्ता काबीज केली. त्या निवडणुकीआधी बऱ्याच आमदारांनी तृणमूलमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, निवडणूक निकालानंतर तृणमूल सोडल्याची खंत त्यातील अनेकांकडून व्यक्त केली जाऊ लागली.
त्यातून काही आमदारांनी भाजपला रामराम ठोकून तृणमूलमध्ये परतण्याचा मानस बोलून दाखवला. तृणमूलनेही निवडक घरवापसीला हिरवा कंदील दाखवल्याचे समजते. त्यामुळे अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत चार आमदार स्वगृही परतले आहेत. त्या गळतीसत्रामुळे बंगालची सत्ता काबीज करण्याचे स्वप्न भंगलेल्या भाजपला एकापाठोपाठ हादरे बसू लागले आहेत.
आता भाजपने पक्ष सोडणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी पाऊले उचलण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्या पक्षाचे गळतीसत्र थांबणार की कायम राहणार याविषयीची उत्सुकता बळावली आहे.