वॉशिंग्टन – जगात दरवर्षी होणाऱ्या पाच पैकी एक मृत्यू म्हणजेच 20 टक्के मृत्यू हे चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे होत असतात. निरोगी आणि दीर्घायुष्य हवे असेल तर लोकांनी आपल्या आहारामध्ये ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करावा असा सल्ला आहार तज्ज्ञांनी दिला आहे.
आहार तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे योग्य आहारामुळे ज्याप्रमाणे लहान मुलांची योग्य प्रमाणात चांगली वाढ होते त्याचप्रमाणे तरुणांमध्ये हृदयविकार मधुमेह आणि स्थूलपणा या विकारांना ही लांब ठेवता येते. अमेरिकेतील आकडेवारी प्रमाणे 2 ते 19 वयोगटातील 20 टक्के लोकसंख्या तर वीस पेक्षा जास्त वय असणाऱ्या 40 टक्के लोकसंख्याला सध्या स्थूलपणाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
स्थूलपणामुळे टाइप 2 डायबिटीस आणि कर्करोगाचा धोकाही वाढत असतो. लॅन्सेट या आरोग्यविषयक आघाडीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या माहितीप्रमाणे 1990 ते 2017 या कालावधीमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासाप्रमाणे तब्बल 20 टक्के मृत्यू हे चुकीच्या आहाराच्या सवयी मुळे झालेले आहेत.
लॅन्सेट मासिकातर्फे जगभरातील 195 देशांमध्ये या बाबतचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष समोर आला आहे. लोकांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये 50 टक्के भाग फळ आणि भाज्यांमध्ये आणि उर्वरित भाग प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स मध्ये विभागीत केला तर त्यांना योग्य आहार मिळू शकतो असा सल्ला या अभ्यासात देण्यात आला आहे.
दररोजची भूक 50 टक्के प्रमाणात फक्त फळं आणि भाज्या यांच्या माध्यमातूनच भागली पाहिजे असा सल्ला आहार तज्ञांनी दिला आहे. भारतात 1 ते 7 सप्टेंबर हा सप्ताह दरवर्षी राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त भारतातील आहार तज्ञ यांनी भारतीयांना योग्य प्रकारे आहाराचे नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे.
खाण्या-पिण्याच्या सवयी मुळे हृदयरोग, मधुमेह आणि स्थूलपणा हे अतिशय घातक रोग जडत असल्याने सर्वांनीच काळजी घ्यावी आणि आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल करावा असेही सुचविण्यात आले आहे.