राहुल गोखले
सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचे आणि नेतृत्वाचे स्मरण व्हावे. किमान त्याच पक्षातील आणि क्षेत्रातील लोकांनी तरी केवळ मौखिक श्रद्धांजली वाहू नये!
केंद्रासह अनेक राज्यांत भाजपची सत्ता असल्याने भाजपमध्ये कमालीची आवक अन्य पक्षांतून होत आहे. भाजपमध्ये उघड स्पर्धा दिसत नसली तरीही ती सुप्त स्वरूपात असतेच. मध्यंतरी चंद्रकांत पाटील यांनी पक्षाने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचे ठरवले तर आपण नाही कशाला म्हणू, असे वक्तव्य करून खळबळ निर्माण केली होती. ते विधान गमतीने त्यांनी केले होते, असे म्हणावे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यावरील प्रतिक्रिया मात्र गंभीर होती. सध्या आपणच मुख्यमंत्री आहोत असे फडणवीस म्हणाले.
एकूण सत्ता सर्वांनाच हवी असते आणि भाजप नेतृत्व तर सध्या काहीही करून “सत्ता’ अशाच उद्देशाने पछाडलेले दिसते. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपनेच नव्हे तर सगळ्याच राजकीय पक्षांनी सुषमा स्वराज यांच्या राजकीय जीवनाकडे पाहिले पाहिजे. राजकारणात राहूनही विधिनिषेधशून्य तडजोडी करण्याचे कारण नसते आणि त्याच वेळी अनावश्यक सत्ताहव्यास धरण्याचेही कारण नसते हेच सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाचे मर्म होते. किंबहुना भाजप आता ज्या वाटेवर आहे त्या परिस्थितीत तर स्वराज यांच्या नेतृत्व गुणांचे आणि त्याहून अधिक त्यांनी जपलेल्या मूल्यांचे स्मरण भाजपने ठेवणे अधिक गरजेचे आहे.
सुषमा स्वराज यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून शारीरिक अस्वास्थ्यामुळे माघार घेतली आणि नंतर त्या मंत्रीही झाल्या नाहीत आणि तरीही सर्व घडामोडींवर त्यांचे लक्ष होते. हा जो एकप्रकारचा अलिप्तपणा आणि तरीही दूरस्थ स्वारस्याचा समतोल लागतो तो सुषमा स्वराज यांच्यात होता. भाजपच्या नव्या नेत्यांमध्ये तो किती आढळतो हा संशोधनाचा विषय होईल. जे करायचे ते केवळ प्रसिद्धीसाठीच आणि पक्षातील बड्या नेत्यांशी आपले कसे जवळकीचे संबंध आहेत याचे प्रदर्शन घडविण्यासाठीच हा प्रघात भाजपमध्ये देखील रूढ झाला आहे.
पत्रकार कल्याणी शंकर यांनी भारतातील महिला राजकीय नेत्यांवर “पॅंडोराज डॉटर’ नावाचे पुस्तक काही वर्षांपूर्वी लिहिले आणि त्यात सुषमा स्वराज यांचाही समावेश होता. कल्याणी शंकर यांनी सुषमा स्वराज यांच्या अंगी असणारा कणखरपणा, निर्धार, तत्त्वनिष्ठा यांचे अनेक दाखले दिले होते. राजकीय कारकिर्दीची सुरुवात होत असताना अनेकदा नेते-कार्यकर्ते तडजोडीकडे झुकतात किंवा मिळालेले पद टिकवून ठेवण्याचा आटापिटा करतात. नेत्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करतात कारण आपले राजकीय भवितव्य त्या नेत्याच्या हातात आहे, असे मानले जाते. मात्र सुषमा स्वराज यांच्याकडून राजकारणातील नवोदितांनी शिकण्यासारखे हेच आहे.
आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांत सुषमा स्वराज यांनी हरियाणा विधानसभेची निवडणूक खुद्द जयप्रकाश नारायण यांच्या सूचनेवरून लढविली होती आणि त्या विजयीही झाल्या; एवढेच नव्हे तर सर्वांत तरुण मंत्री बनल्या आणि त्यांच्याकडे कामगार खाते सोपविण्यात आले. पण हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि राजकारणातील दिग्गज देवीलाल यांच्याशी त्यांचे मतभेद झाले. एका उद्योगपतीने देवीलाल यांच्याकडे सुषमा स्वराज यांनी सर्व कामगार संघटनांशी कराराची प्रकरणे पुन्हा खुली केली आहेत अशी तक्रार होती. याला कारणीभूत होती ती सुषमा स्वराज यांची भूमिका. ती म्हणजे कामगार प्रश्नांवर त्रिपक्षीय वाटाघाटी व्हाव्यात. अर्थात त्याच बैठकीत देवीलाल यांनी सुषमा स्वराज यांना त्यांचे खाते बदलले जाईल अशी धमकी दिली.
सुषमा स्वराज यांनी पहिलेवहिले मिळालेले मंत्रिपद सोडून दिले. हे धाडस आता अगदी भाजपमध्ये देखील किती जण दाखवतील आणि मतभेद व्यक्त न करण्याला पक्षशिस्तीची सबब देतील? पण सुषमा स्वराज यांनी राजीनामा दिला तरीही मोरारजी देसाई, चंद्रशेखर यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांच्या दबावापोटी देवीलाल यांना सुषमा स्वराज यांना अवघ्या 21 दिवसांत पुन्हा सरकारमध्ये घ्यावे लागले. तेव्हा कर्तव्यनिष्ठ राहताना पक्ष किंवा संघटनेच्या ध्येयधोरणांपेक्षा नेता किंवा व्यक्ती मोठी होणार नाही असे ठणकावून सांगण्याचे प्रसंग येत असतात. त्यावेळी कृती अधिक बोलकी असते. सुषमा स्वराज यांनी आपली राजकीय कारकीर्द एका अर्थाने पणाला लावली; पण तत्त्वांशी तडजोड केली नाही.
भाजपमध्ये सुरुवातीच्या काळात मुळात महिला नेत्या कमीच होत्या आणि त्यातील प्रभावशाली तर नगण्य. हरियाणात सुषमा स्वराज यांनी शिक्षण खात्याच्या मंत्री म्हणूनही काम केले आणि जे खाते केवळ शिक्षकांच्या बेसुमार बदल्या करण्यासाठी प्रख्यात होते. तेथे त्यांनी त्या खात्याचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला एवढेच नव्हे तर शिक्षकांच्या बदल्यांसाठी धोरण तयार केले. तेव्हा आपल्या खात्याची सूत्रे मंत्री म्हणून आपल्याकडे असावयास हवीत आणि त्या मंत्रिपदाचा उपयोग व्यापक जनहितासाठी व्हावा हे सुषमा स्वराज यांचे ब्रीद तेव्हापासून होते.
हरियाणासारख्या छोट्या राज्याच्या राजकारणात सुषमा रमणाऱ्या नव्हत्या. त्यांना भाजपने राष्ट्रीय राजकारणात संधी दिली आणि प्रत्येक संधीचे रूपांतर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविण्यात केले. पक्षात त्यांनाही विरोधक होतेच. आपली राजकीय कारकीर्द त्यांनी अनेकदा पणाला लावली; पण मुळात इरादा स्पष्ट आणि स्वच्छ असल्याने त्यांच्या राजकारणाला कधी स्वल्पविराम मिळाला तरीही पूर्णविराम मिळाला नाही.
सुषमा स्वराज यांचे राजकीय जीवन चढउतारांचे होते; परंतु त्यांनी कधीही पक्षनिष्ठा स्वतःपेक्षा किंवा कोणत्याच नेत्यांपेक्षा छोटी होऊ दिली नाही. सुरक्षित जागा शोधून निवडणूक जिंकण्याच्या काळात सुषमा स्वराज यांनी आपले राजकीय भवितव्य पणाला लावणे दुर्मीळ वाटावे असेच. मूल्याधिष्ठित राजकारण लयास जात असताना सुषमा स्वराज यांची मूल्यांवर भर देण्याचा आणि त्यासाठी किंमत मोजण्याची तयारी ठेवण्याची निर्धारी वृत्ती आगळी अशीच. जेव्हा सत्तेसाठी धावाधाव होत आहे तेव्हा ध्येयवादासाठी पदाचा राजीनामा देणे कपोलकल्पित वाटावे असेच.