सु. ल. हिंगणे
आद्य शंकराचार्यांनी तयार केलेल्या चार धर्मपीठांपैकी बद्रीनाथ आणि शारदा पीठ या दोन पीठांचे शंकराचार्य असलेले स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे नुकतेच ब्रह्मलीन झाले.
सनातन हिंदूधर्मामध्ये शंकराचार्य हे सर्वोच्च धर्मगुरू मानले जातात. साधारणतः 1300 वर्षांपूर्वी आद्यगुरू शंकराचार्यांनी हिंदूधर्माच्या अनुयायांच्या संघटनासाठी आणि धर्माच्या उत्थानासाठी संपूर्ण भारतभरात चार धार्मिक मठ तयार केले. यामध्ये उत्तरेतील बद्रिकाश्रमातील ज्योतिर्मठ, दक्षिणेतील शृंगेरी मठ, पूर्वेला जगन्नाथपुरीतील गोवर्धनमठ आणि पश्चिमेकडील द्वारकेतील शारदा मठ यांचा समावेश होता. या मठांच्या प्रमुखपदावरील व्यक्तीला मठाधीश म्हटले जाते आणि याच मठाधीशांना “शंकराचार्य’ ही उपाधी दिली जाते. बौद्धधर्मात “दलाई लामा’ किंवा ख्रिश्चन धर्मांमध्ये “पोप’ना जे स्थान आहे त्याचप्रकारे हिंदूधर्मामध्ये “शंकराचार्यां’ना स्थान आहे.
यातील बद्रीनाथ आणि शारदा पीठ या दोन पीठांचे शंकराचार्य असलेले स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे नुकतेच ब्रह्मलीन झाले. सनातन संस्कृती आणि धर्माच्या प्रचार व प्रसारासाठी समर्पित आयुष्य जगलेल्या स्वामीजींच्या आयुष्याचा प्रवास हा खडतर राहिला. आठवड्याभरापूर्वी त्यांचा 99 वा जन्मदिन साजरा झाला. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. स्वामीजींचे बालपणीचे नाव पोथीराम उपाध्याय असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव धनपती उपाध्याय. 1950 च्या सुमारास स्वामी स्वरूपानंद हे दंडधारी संन्यासी बनले. त्यांनी शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्याकडून दंडसंन्यासाची दीक्षा घेतली होती. त्यानंतर ते स्वामी स्वरूपानंद सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले.
1973 मध्ये त्यांना शंकराचार्य ही उपाधी मिळाली. धार्मिक कार्यातील योगदानाबरोबरच स्वामी स्वरूपानंदांची दुसरी ओळख आहे ती स्वातंत्र्यसैनिक म्हणून. भारत छोडो आंदोलनादरम्यान त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे त्यांना “क्रांतिकारी साधू’ म्हणूनही संबोधले जात होते. विशेषतः पूर्वांचल भागामध्ये ते या नावाने सुप्रसिद्ध होते. 1942 मध्ये जेव्हा “भारत छोडो’ आंदोलनाची घोषणा झाली तेव्हा त्यांनीही या आंदोलनात उडी घतली. अवघ्या 19 वर्षांच्या या पोथीरामने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने औडिहार रेल्वे स्टेशन उडवून दिले होते. त्यानंतर सैदपूर तहसील कार्यालय फोडून इंग्रजांचे कार्यालयही नेस्तनाबूत केले होते. ब्रिटिशांच्या अधिकाऱ्यांनी अखेरीस त्यांना जेरबंद केले. स्वातंत्र्यलढ्यादरम्यान त्यांना वाराणसीमध्ये नऊ महिने आणि मध्य प्रदेशातील तुरुंगात 6 महिने तुरुंगवास भोगावा लागला.
मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील दिघोरी गावात जन्मलेल्या स्वामी स्वरूपानंदांनी वयाच्या नवव्या वर्षीच घर सोडले होते. प्रसिद्ध धार्मिक तीर्थस्थळे आणि विविध संतांचे दर्शन घेत ते काशीला पोहोचले. त्यापूर्वी रामपूरमधील पाठशाळेमध्ये त्यांनी धर्मसंस्कृतीचे धडे घेतले. काशीमध्ये स्वामी करपात्री महाराज आणि स्वामी महेश्वरानंद महाराज यांसारख्या संतांकडून त्यांना वेदवेदांग आणि धर्माविषयीचे ज्ञान मिळाले.
स्वामी स्वरूपानंद हे धर्मातील पाखंडीपणाबाबत अत्यंत कठोर राहिले. केवळ भगवी वस्त्रे परिधान करून कोणी सनातनी बनत नाही, असे ते नेहमी सांगत असत. 2013 मध्ये प्रयागराज येथे भरलेल्या कुंभमेळ्यादरम्यान शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेवरून नाराज व संतप्त होऊन त्यांनी त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. अखेरीस अखिलेश यादव यांनी शंकराचार्यांच्या उपस्थितीशिवाय कुंभमेळ्याची शान नाही, असे म्हणत त्यांची मनधरणी केल्यानंतर ते या महामेळ्याला उपस्थित राहिले होते. गंगा नदीला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित करण्यामध्ये स्वामी स्वरूपानंदांनी अग्रणी भूमिका निभावली होती. रामसेतू रक्षक म्हणूनही त्यांची ओळख होती. तसेच रामजन्मभूमी आंदोलनादरम्यानही त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याची मागणी करणे, उत्तराखंडातील हायड्रो प्रकल्पांना विरोध करणे, तसेच समान नागरी कायद्याचा पुरस्कार करणे यांसारख्या अनेक भूमिकांमुळे ते चर्चेत राहिले.
स्वामीजींच्या आयुष्यात नऊ हा आकडा नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत आल्याचे सांगितले जाते. नवव्या वर्षी गृहत्याग, 19 व्या वर्षी क्रांतिकारी साधू म्हणून लोकप्रिय होणे आणि 99 वर्षे पूर्ण झाल्यानंतर शरीर त्याग करणे यांवरून याला पुष्ठी मिळते. आजवरचा इतिहास पाहिल्यास स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे सर्वांत प्रदीर्घ काळ दोन पीठांचे प्रमुख म्हणून कार्यरत राहिले. त्यामुळे त्यांना द्विपीठाधीश्वर असेही म्हटले जाते. शैव, नाथ, दशनामी आणि अघोर व शाक्त परंपरेतील साधूसंतांना निधनानंतर भूसमाधी दिली जाते. त्यानुसार स्वामी स्वरूपानंद यांनाही समाधीस्थ करण्यात आले.