अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांचे आवाहन
पुणे – सर्दी, तापाची लक्षणे दिसत असल्यानंतरही लोक तपासणीसाठी येत नाहीत. चार-पाच दिवसांनंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर उपचारासाठी येतात. प्रामुख्याने मधुमेह, रक्तदाब आणि अन्य विकार असलेल्यांची प्रकृती अधिकच गंभीर होते. दुर्देवाने अशाच व्यक्ती करोनाला बळी पडल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. यामुळे सर्दी, तापाची लक्षणे दिसताच नागरिकांनी करोनाची तपासणी करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले.
शहरात 10 मार्चला पहिला करोनाचा रुग्ण आढळून आला. यानंतर रुग्णांची संख्या हळूहळू वाढत गेली. मागील दोन महिन्यांत अडीच हजारांहून अधिक नागरिकांना याची लागण झाली असून, 150 जणांचा यामध्ये बळी गेला आहे. महापालिकेने शहरात विविध संस्थांच्या मदतीने आरोग्य चाचण्या आणि सर्वेक्षण सुरू केल्याने रुग्ण आढळून येत आहेत. परंतु, ताप, सर्दी अशी लक्षणे आढळल्यानंतरही काही नागरिक या तपासणीसाठी पुढे येत नाही. परस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर नागरिक उपचारांसाठी दाखल होतात.
मृतांचे प्रमाण 50 पुढील वर्ष वयोगटातील अधिक आहे. आतापर्यंत मृत झालेल्या सर्वच वयोगटातील नागरिकांना पूर्वीचे आजार आहेत. आधीच प्रतिकारशक्ती कमी आणि त्यात करोनाची लागण झाल्यानंतर त्याची परिस्थिती गंभीर होते. त्यानंतर त्यांचे अन्य अवयव पण निकामी होतात आणि रुग्णाकडून उपचारांना साथ मिळत नाही. मृत्यू झालेल्यांपैकी बहुतांश रुग्ण हे अगदी दोन ते तीन दिवस अगोदर रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत.