पिंपरी -करोनामुळे नुकसान सहन करणाऱ्या ट्रॅव्हल्स अँड टूरिजम व्यवसायाला या उन्हाळ्यात “अच्छे दिन’ दिसत आहेत. यंदा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उन्हाळी सुटीत पर्यटनस्थळी जाणे पसंत केल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
यंदा एसटी महामंडळाच्या वतीने विविध सवलतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी एसटीकडे वळत आहेत. परिणामी एसटी बसही खचाखच भरून जाताना दिसत आहेत. तर दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्स एजेंटचीही चलती आहे.
उन्हाच्या झळा लागू नये, यासाठी रात्रीच्या प्रवासाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी लातूर, सोलापूर, नागपूर, सुरत, औरंगाबादसह इतर मार्गांवरील रात्रीच्या शयनयान बसगाड्यांचे तिकीट दर दुप्पट केले आहेत. उन्हाळी सुट्टी आणि नागरिकांची गावाला जाण्याची ओढ असल्याने प्रवासी दुप्पट तिकीट देऊन कूल प्रवास करण्यास पसंती देत आहेत. कोकणासह, लातूर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, सुरत यांसह राज्य आणा राज्याबाहेर जाणाऱ्या रात्रीच्या वातानुकूलित शयनयान बसगाड्यांचे तिकीट वाढवण्यात आले आहेत. सुट्टी आणि गर्दीच्या हंगामात खासगी ट्रॅव्हल्स चालक-मालकांकडून दुप्पट तिकीट दर आकारले जात आहेत. मागील आठवड्यात नागपूरसाठी तीन हजार, सुरतसाठी 1500 रुपये तिकीट आकरण्यात आले आहे.
विदेशी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ
यावर्षी विदेशी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे. तेथील हवामानाचा अंदाज घेत पर्यटन स्थळे निवडली जात असून पाश्चात्य देशांना भेट देणाऱ्यांची संख्या अधिक आहे.