आंबेगाववासीय समस्यांनी ग्रासलेले : राजकीय नेतेही मूग गिळून गप्प
मंचर – आंबेगाव तालुक्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी, भूमी अभिलेख अधिकाऱ्यांची बदली झाल्यामुळे या पदावर प्रभारी अतिरिक्त चार्ज इतर अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी हे कार्यालयात वेळेवर उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, गटविकास अधिकारीपद सात महिन्यांपासून रिक्त होते अखेर शुक्रवारी (दि. 26) प्रमिला वाळुंज-पाटील यांची गटविकास अधिकारीपदी नियुक्त करण्यात आली.
तहसीलदार, गट विकास अधिकाऱ्यांची काही महिन्यांपूर्वी बदली झाली आहे. बदली झाल्यानंतर या पदांचा अतिरिक्त कारभार हा जुन्नर येथील तहसीलदार, गटविकास अधिकारी हे पाहत आहे. हे अधिकारी जुन्नर येथे कार्यरत असून वेळ मिळेल तसा आंबेगाव तालुक्यातील कामकाजाकडे लक्ष देत आहे. त्यामुळे ते नागरिकांना कार्यालयात उपलब्ध होत नाही. तहसीलदार, गटविकास अधिकारी ही तालुक्यातील महत्त्वाची पदे असून सर्वसामान्य जनतेची कामे या अधिकाऱ्यांकडे असतात.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानभरपाई मिळाली नाही, त्याचा पाठपुरावा कोण करणार? विविध शेतकऱ्यांच्या जमिनी संदर्भात अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. काही दिवसांनी पावसाळा सुरू होईल, तसेच शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे विविध दाखले मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात यावे लागते. हे सर्व लहान, मोठे विषय हाताळण्यासाठी तहसीलदार तालुक्याच्या ठिकाणी असणे गरजेचे आहे.
भूमी अभिलेखपद चार वर्षांपासून रिक्त
आंबेगाव तालुक्यातील भूमी अभिलेख अधिकारी हे पदही गेल्या चार वर्षांपासून रिक्त असल्याने शेती विषय अनेकप्रश्न प्रलंबित आहेत. तसेच आंबेगाव तालुक्याला कायमस्वरूपी तहसीलदार, गटविकास अधिकारी लवकरात लवकर नियुक्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.