पुणे – भारताच्या आद्य संस्कृतीच्या अनेक खुणा पुरातत्त्वीय संशोधकांनी शोधून काढल्या आहेत. अगदी अश्म ते पाषाण, ताम्र, लोह युगापर्यंतचे दाखले यातून आपल्याला मिळत आहेत. त्यातीलच एक संशोधन हे महापाषाणयुगातील शीळावर्तुळे आहेत. त्याविषयीचे संशोधन डेक्कन महाविद्यालयातील ओशिन बंब या विद्यार्थी संशोधकाने वर्धा येथे केले असून, त्याला तब्बल 71 शीळावर्तुळे सापडली आहेत.
वर्धेपासून 17 किमी अंतरावरील येसंबा येथील पठारावर ही शीळावर्तुळे आहेत. ही वर्तुळे आदिम समाजातील विशिष्ट दफन पद्धत असावीत. याविषयीचा संशोधनपर लेख “जर्नल ऑफ हिस्ट्री आर्किओलॉजी अँड आर्किटेक्चर’च्या विशेषांकात यापूर्वीच प्रसिद्ध झाला आहे.
दक्षिण भारत आणि विदर्भात विविध ठिकाणी उत्खननातून अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. तत्कालीन समाजात मृत पूर्वजांना अत्यंत आदरपूर्वक आणि विशिष्ट पद्धतीने जमिनीत पुरवण्याची पद्धत प्रचलित होती. त्या व्यक्तीच्या आवडीच्या वस्तू, लोखंडी, ताम्र अवजारे, दागिने, अनेकदा पशुसुद्धा व्यक्तीसोबत दफन करत होते. येसंबा येथे अशीच पद्धत प्रचलित असावी, असे संशोधक ओशीन बंब म्हणाले. या शोधामुळे त्या काळातील मानवी वास्तव्याचा शोध लागला आहे. नागपूर विद्यापीठ, डेक्कन कॉलेज पुणे आणि राज्य पुरातत्त्व विभागाचे संशोधन सुरू आहे.
वाढते नागरिकरण आणि बांधकामाला लागणाऱ्या मुरुम आदी साहित्याच्या उपशामुळे पुरातत्त्वीय गोष्टी नष्ट होतात. त्यांचे संरक्षण आणि अधिक संशोधन अत्यंत आवश्यक आहे.
– ओशिन बंब,संशोधक विद्यार्थी,डेक्कन महाविद्यालय, पुणे
अशी आहेत शीळावर्तुळे
येसंबा येथे सापडलेल्या या शीळावर्तुळांच्या रचनेमध्ये बाहेरील मोठे दगड विविध आकाराचे असून, आतमध्ये लहान दगडांनी भरलेले दिसून आले. कदाचित पुनर्जन्म आणि मृत व्यक्तीबद्दल आदरभाव कारणांमुळे तत्कालीन ग्रामीण संस्कृतीमध्ये ही विशेष दफनविधी परंपरेने प्रचलित होती. शीळावर्तुळाच्या आकार आणि सापडलेल्या दफन सामग्रीवरून व्यक्तीच्या सामाजिक स्तराचा परिचय होतो, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.