maratha reservation – मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील २० जानेवारी रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्यासह अनेक मराठा बांधवही मुंबईत येऊन शांततेत आंदोलन पुकारणार आहेत. हे आंदोलन राज्यव्यापी असणार असल्याने राज्यातील विविध कोपऱ्यातील मराठा बांधव मुंबईत धडकू शकतात.
त्यामुळे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे सर्व थांबवण्याकरता सरकार पातळीवर ट्रॅप रचणे सुरू असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा केला. तसेच २० जानेवारीला मुंबईत येणारच असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
मनोज जरांगे म्हणाले, सरकार माध्यमांना बातम्या देतात की मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा निघालेला आहे. परंतु, प्रत्यक्षात कोणताही तोडगा निघालेला नाही. गिरीश महाजनही म्हणाले होते की मराठा आंदोलकांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, त्याआधीच मराठा आरक्षण मिळेल.
पण कुठे आहे आरक्षण? सगेसोयरे शब्दाची व्याख्या स्पष्ट केलेली असतानाही त्यात सातत्याने गोंधळ निर्माण केला जात आहे. त्यामुळे मी मरेपर्यंत इथून हटणार नाही. तुम्ही मराठ्यांना पक्क आरक्षण दिल्याशिवाय जागाच सोडणार नाही. मी मुंबईत येणार म्हणजे येणारच.
“आमचं म्हणणं आहे की ज्याची नोंद सापडली त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, त्यांच्या नातेवाईकांनाही प्रमाणपत्र द्या. त्या आधारावर त्यांच्या सगे सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्या.
शिष्टमंडाळाने सांगितले होते की येत्या सहा दिवसांत रांत्रदिवस काम करून नोंदी सापडलेल्या ५४ लाख मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देतो. पण अद्यापही प्रमाणपत्रांचे वाटप झालेले नाही, असेही जरांगे म्हणाले.