मुंबई- राज्यातील कृषि आणि कृषि संलग्न विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण देतानाच वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) आणि प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थांनी (रामेती) यापुढे महिला, शेतकरी, शेतमजूर यांनाही कृषिविषयक कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, हे घटकही कृषि विस्ताराचे काम करीत असल्याने त्यांच्या प्रशिक्षणासाठी नियोजन आणि धोरण तयार करा, अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिल्या. वनामती आमि रामेती यांच्या प्रशिक्षण कार्यक्रम आणि नियोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले होते. त्यावेळी भुसे बोलत होते.
कृषि अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण ही संस्था घेते ही चांगली बाब आहे. मात्र, सध्या अधिक व्यापक विचार करण्याची गरज आहे. कृषि विकासासाठी पूरक घटकांना प्रशिक्षण दिले तर कृषि विषयक योजनांची अंमलबजावणी अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकेल.
सन 2022 हे वर्ष आपण कृषि क्षेत्रासाठी महिला वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषि योजनांचा महिलांना अधिकाधिक लाभ देऊन त्यांना प्रगतीच्या दिशेने आपण नेऊ शकू. प्रशिक्षणाच्या माध्यमातून ही गोष्ट साध्य होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
सध्या राज्य शासनाचा भर हा शेतकऱ्यांना आर्थिक बळकट बनविणे हा आहे. त्यासाठी बाजारपेठेची गरज ओळखून विकेल ते पिकेल ही संकल्पना राबविली जात आहे. त्या अनुषंगाने महिला, शेतकरी, शेतमजूर, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट यांना प्रशिक्षण दिले तर खऱ्या अर्थाने कृषि विस्ताराची संकल्पना आपण पुढे घेऊन जाऊ, असेही त्यांनी नमूद केले.