पिंपरी – शहरातील रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांमुळे शहरातील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे शहरातील वाहतूक मंदावली आहे. तर, यामुळे वाहने एकमेकांना धडकून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
महापालिकेचे अधिकारी पावसाळयाचे कारण सांगून खड्डे बुजविण्यास टाळाटाळ करीत आहेत. कुठे अपघात झाला यानंतर कुणी तक्रार केल्यावर त्या रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे शहरातील प्रमुख चौकातील सिग्नलवरील तसेच सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या मुख्य मार्गांवर देखील खड्डयांमुळे वाहतूक मंदावत असून याचा त्रास शहरवासियांना करावा
लागत आहे.
महापालिकेच्या परिसरात वाहन विनाअडथळे धावेल असा, एकही रस्ता नाही. अगदी जुन्या पुणे-मुंबई महामार्गापासून ते ग्रेड सेपरटेर आणि सर्वच उपनगरातील अंतर्गत रस्त्यापर्यंत ही समस्या आहे. चिंचवड, निगडी, वाल्हेकरवाडी, केशवनगर, आकुर्डी, प्राधिकरणातील अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तर, काही ठिकाणी खोदाई
केली आहे.
पावसाळाचे कारण पुढे करुन महापालिकेने त्या खड्डयांच्या दुरुस्तीसाठी हात वर केले होते. महापालिकेकडे तक्रार आल्यास अथवा स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरुन आवश्यक तेथे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, शहरातील काही प्रमुख चौकातील स्थिती मात्र
बिकट आहे.
या खड्डयांमुळे वाहतूक कोंडीमध्ये अधिकच भर पडते, ही वस्तुस्थिती आहे. त्याला वाहतूक शाखेने दुजोरा दिला आहे. शहरातील जुन्या पुणे-मुंबई मार्गावरील आकुर्डी, मोरवाडी, चिंचवड स्टेशन, कासारवाडी, दापोडी या चौकात खड्डे पडले आहेत. अंतर्गत भागातील अहिंसा चौक, बिजलीनगर चौक, काळेवाडी रस्ता, चापेकर चौक, बिजलीनगर, जुना जकात नाका, थेरगाव चौक, डांगे चौक या प्रमुख आणि वाहत्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. वाहने चौकात थांबल्यानंतर सिग्नल सुटल्यानंतर वेगाने पुढे जातात. मात्र, या खड्डयामुळे पुन्हा वेग कमी होतो. त्याचा पाठीमागून येणाऱ्या वाहनांना अंदाज येत नसल्याने अपघातांचे प्रसंग घडतात.
रस्ते खोदाईमुळे वाहतुकीची कोंडी –
पिंपळे गुरव, नवी सांगवी, दापोडी, कासारवाडी, काळेवाडी या उपनगरांमध्ये विविध विकास कामांच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवलेले आहेत. या खोदाई केल्यामुळ धूळ, माती, चिखल साठलेले आहे. याचा नागरिकांना त्रास होत आहे. तदेच रस्ते खोदल्याने सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी मोंया प्रमाणावर होते. त्यामुळे वाहन चालक वैतागून आहेत.