पुणे – वीजप्रवाह बंद झाल्यानंतर अचानक बंद झालेल्या सिग्नलमुळे वाहतुकीचा बोजवारा उडतो. त्यावर नियंत्रण मिळवताना वाहतूक पोलिसांची अक्षरश: धांदल उडते. त्यातून जर घाईगर्दीच्या वेळी असे झाले तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. त्यावर महापालिकेने उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला असून, शहरातील प्रमुख 42 चौकांतील सिग्नलला बॅटरी इन्व्हर्टर लावण्यात आली आहे. या बॅटरीवर सिग्नल विनावीजप्रवाह 24 तास सुरू राहू शकतात.
रस्त्यावर लावलेल्या सिग्नलची देखभाल दुरुस्ती महापालिकेकडून केली जाते. शहरात सुमारे 242 चौकांत सिग्नल बसवले आहेत. त्यामध्ये वेळेचे सेटिंग हे त्या चौकातील गर्दीच्या अनुषंगाने वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार केले जाते. गर्दीनुसार वाहतूक पोलीस त्यात बदल करत असतात. अनेकदा वीजपुरवठा अचानक खंडीत झाल्यानंतर सिग्नल यंत्रणाही बंद होते. त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊन वाहतूक कोंडी आणि पर्यायाने वाहतूक पोलिसांवर ताण येतो. त्यामुळे यातील 42 प्रमुख चौकांतील सिग्नल्सना महापालिकेने 10 लाख रुपये खर्चून इन्व्हर्टर बसवले आहेत.
याठिकाणी आहेत हे सिग्नल्स
बालगंधर्व चौक, बोपोडी चौक, अंडी उबवणी केंद्र, संचेती चौक, सिमला ऑफिस चौक, कात्रज डेअरी चौक, खंडूजीबाबा चौक, स्वारगेट जेधे चौक, सेवन लव्हज चौक, बुधवार चौक, आठवले चौक, वडगाव पूल, वारजे पूल, वनदेवी चौक, रसशाळा चौक, रेंजहिल्स चौक, गुडलक कॅफे चौक, पुरम चौक, पंचमी हॉटल चौक, अलका टॉकीज चौक, दांडेकर पूल चौक, विमाननगर चौक, शास्त्रीनगर चौक, गुंजन थिएटर चौक, गोल्फ क्लब चौक, सादलबाबा चौक, चंद्रलोक हॉस्पिटल चौक, पुष्पमंगल चौक, शारदा आर्केड चौक, कात्रज बाइपास, ज्योती हॉटेल चौक, लुल्लानगर चौक, खराडी बायपास चौक, खराडी दरगाह चौक, केशवनगर चौक, मंतरवाडी फाटा चौक, वैदुवाडी चौक, रामटेकडी चौक, फातिमानगर चौक, भैरोबानाला चौक, शाहीर अमर शेख चौक आणि मालधक्का चौक.