सांगवी – पिंपळे गुरव येथील तुळजाभवानी मंदिर ते वाकड-भोसरी बीआरटीएस रस्त्यावर सृष्टी चौकात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना अवघ्या पाचशे मीटर अंतरासाठी तब्बल एक ते दीड तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. वाहतूक कोंडी होऊनही वाहतूक पोलीस मात्र या ठिकाणी दिसत नाहीत. या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून वाहतूक पोलिसांनी सायंकाळी नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पिंपळे गुरवमधील हा महत्त्वाचा रस्ता आहे. औंध, सांगवीतून पिंपरी, पिंपळे सौदागरकडे जाण्या-येण्यासाठी स्कूल बसेस, कंपनीच्या बसेस, रिक्षा, पीएमपीएमएल बसेस, दुचाकीस्वार या रस्त्याचा सर्रास वापर करतात. रस्ता प्रशस्त झाल्याने वाहने नेहमीच सुसाट असतात. मात्र, पिंपळे गुरवमधील सृष्टी चौकात कासारवाडीकडून येणारी वाहने, जगताप पेट्रोल पंपाकडून येणारी वाहने, सांगवी, औंधकडून येणारी वाहने आणि वाकड-भोसरी बीआरटीएस रस्त्यावरून पिंपळे गुरवकडे येणारी वाहने सृष्टी चौकात येतात. परंतु सृष्टी चौकात वाहतूक पोलीस नसल्यास मोठी वाहतूक कोंडी होते.
सायंकाळी सहानंतर सृष्टी चौक ते गजेबो हॉटेल व भगतसिंग चौक ते सृष्टी चौक या रस्त्यावर सायंकाळी बेशिस्तपणे लावलेली वाहने, हातगाड्या व आडव्या तिडव्या लागलेल्या रिक्षा, तसेच बसथांबाही भर चौकात असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. परिणामी चालत जाणारे वयस्कर व्यक्ती, महिला व लहान मुलांना अक्षरशः जीव मुठीमध्ये घेऊन ये-जा करावे लागते. अनेकदा वाहतूक कोंडी झाल्यावर वाहतूक पोलीस पोहोचतात. सामाजिक कार्यकर्तेच बहुतेक वेळा कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.
या रस्त्याने नियमित ये-जा असते. औंधवरून लवकर येऊनही पिंपळे गुरवमध्ये वाहतूक कोंडीत आडकावे लागते. रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरासाठी तब्बल दीड दीड तास वेळ जातो. यामुळे आधीच महाग झालेले इंधन जास्त लागते. हे चित्र बदलायला हवे.
– स्थानिक नागरिक.
सृष्टी चौकात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे दररोज नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. बेशिस्तपणे लावलेली वाहने, आडव्या तिडव्या लागलेल्या रिक्षा, तसेच बसथांबाही भर चौकात असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. परिणामी वयस्कर व्यक्ती, महिला व लहान मुलांना अक्षरशः जीव मुठीमध्ये घेऊन ये-जा करावी लागते. वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे काटेकोर नियोजन करून सिग्नलची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
– नितीन सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते.