भारतीय कसोटी क्रिकेटसाठी 2021 हे स्वप्नवत ठरले. प्रथम ऑस्ट्रियात कसोटी मालिका विजय, त्यानंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद आणि शेवटी इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेतील आघाडी.
एकाच वर्षांत इतके मोठे यश मिळवल्यानंतर भारतीय संघ आपल्या पहिल्या कसोटी मालिका विजयाच्या निश्चयाने दक्षिण आफ्रिकेत खेळत आहे.याच पार्श्वभूमिवर ङ्कडिजिटल प्रभातङ्खने भारतीय फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळलेल्या 3 सर्वोत्तम खेळ्यांचा या लेखात आढावा घेतला आहे.
1. सचिन तेंडुलकर 169 (केप टाऊन – 1996/97)
मास्टर ब्लास्टर सचिनची ही खेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सर्वोत्तम खेळी मानली जाते. 1990 च्या दशकाच्या मध्यापर्यंत सचिनने जागतिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली होती.
1996 च्या कसोटी मालिकेतील केपटाऊन कसोटी सामन्यात 5 बाद 58 अशी दयनीय अवस्था झाली होती. अशात मैदानावर नवखा सचिन आणि अनुभवी महम्मद अझरुद्दीन उतरले.
या जोडीने अवघ्या 40 षटकांत 222 धावांची भागिदारी करत भारताला सुस्थितीत पोहचवले. यामध्ये सचिनने 169 धावांची आक्रमक खेळी केली. 6 तासांच्या या खेळीत सचिनने अॅलन डोनाल्ड, शॉन पोलॉक आणि लान्स क्लुजनर सारख्या दिग्गजांना फोडून काढत तब्बल 26 चौकारांची आतषबाजी केली. आणि1 षटकारही लगावला. तर अझहरने 115 धावांची संयमी खेळी करत भारतावरची फॉलोऑनची नामुष्की टाळली.
2. विराट कोहली 119 (जोहान्सबर्ग – 2013/14)
2013 म्हणजे विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीचा सुरुवातीचा काळ होता. दिग्गज सचिन तेंडुलकरच्या अनुपस्थितीत भारताचा 2013-14 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच दौरा होता. सचिनच्या निवृत्तीनंतर त्याच्या चौथ्या क्रमांकावर विराटच्या रुपाने एक अश्वासक तरुण फलंदाज मिळाला होता.
सर्वांच्या अपेक्षांवर खरे उतरत विराटने जोहन्सबर्ग कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 119 धावांची खेळी करत भारतीय संघाला तारले. डेल स्टेन आणि मोर्ने मॉर्केल यांच्यासारखे दिग्गज गोलंदाज समोर असतानाही नवख्या विराटने न डगमगता नेटाने फलंदाजी करत आपल्या कौशल्याची चुनूक दाखवली.
इतकेच नव्हे तर, बाकी संघ नांगी टाकत असताना विराटने दुसर्या डावातही 96 धावांची खेळी केली. दुर्दैवाने विराटचे शतक 4 धावांनी हुकले अन्यथा तो परदेशात कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शतक झळकावणार्या मोजक्या फलंदाजांपैकी एक ठरला असता.
3. कपिल देव 129 (पोर्ट एलिझाबेथ -1992/93)
1992-93 ची मालिका दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात होणारी पहिली कसोटी मालिका होती. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन समाने अनिर्णित राहिल्यानंतर, तिसरा सामना येईपर्यंत मालिकेची रोमांचकचा कमालीची वाढली होती.
पोर्ट एलिझाबेथच्या हिरव्यागार खेळपट्टीवर दुसर्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत 5 बाद 27 अशी दयणीय अवस्था केली होती.
त्यानंतर कपिल देव यांनी खेळपट्टीवर उतरत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना जेरीस आणले. कपिल यांनी अवघ्या 180 चेंडूंत 14 चौकार आणि एका षटकारासह शानदार 129 धावा करून दक्षिण आफ्रिकेसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली. अखेर या सामन्यात भारताला जरी पराभव स्वीकारावा लागला असला तरी, दक्षिण आफ्रिकेत भारतीय फलंदाजाने आजपर्यंत केलेल्या सर्वोत्तम खेळींपैकी एक म्हणून आजही ओळखली जाते.