मुंबई : राज्यात वाढत जाणाऱ्या ओमायक्रॉन संसर्गाचे सावट पाहता राज्य सरकारकडून नवीन निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यात राज्यात जमाव बंदी व इतर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळेआता शिर्डीतील साई संस्थानानंतर पंढरपूरच्या विठ्ठल मंदीर प्रशासनानेही दर्शनाच्या वेळेवर बंधने आणली आहेत. रात्री 9 वाजता विठूरायाचे मंदीर भाविकांसाठी बंद होणार आहेत. मंदीर प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्य सरकारने घेतलेल्या जमाव बंदीच्या निर्णयाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पंढरपूरमध्ये नाताळाच्या सुट्टीमुळे भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. त्यामुळे विठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ लक्षात घेता मंदीर प्रशासनाने जमाव बंदीच्या अनुषंगाने काही निर्णय घेतले आहेत.
त्यानुसार आता भाविकांसाठी रात्री 9 वाजता मंदीर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना विठूरायाच्या दर्शनासाठी रात्री 9 वाजण्याच्या आधीच मंदिरात प्रवेश करावा लागणार आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात रात्री 9 नंतर जमावबंदी आदेश दिल्याने आजपासून विठ्ठल मंदिर रात्री नऊ वाजता भाविकांसाठी बंद राहणार आहे.
शिर्डीतही नवीन नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नवीन नियमावलीनुसार, साई भक्तांना आता सकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीतच साईबाबांचं दर्शन घेता येणार आहे. जमावबंदीचे आदेश असल्याने रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. काकड आरती आणि शेजारतीलाही भक्तांना प्रवेश मिळणार नाही. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारी म्हणून हे निर्बंध लावण्यात आले आहेत.