सातारा -विविध बॅंकांच्या एटीएम कार्डच्या माध्यमातून एटीएम मशीन्समध्ये तांत्रिक अडथळा निर्माण करून, म्हसवड, वडूज, दहिवडी, सातारा, धायरी (जि. पुणे), कामोठे (जि. रायगड) येथून तीन कोटी 37 लाख 72 हजार 500 रुपये काढणारी चार परप्रांतियांची टोळी उत्तर प्रदेशातील कानपूरमधून जेरबंद करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलिसांनी ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूर येथील संशयित महाराष्ट्रात येत होते. त्यांनी कामोठे (जि. रायगड), धायरी (जि. पुणे) आणि सातारा जिल्ह्यातील सातारा, म्हसवड, वडूज, दहिवडी येथे वेगवेगळ्या बॅंकांच्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन एटीएमच्या स्कॅनरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण केला.
त्यानंतर बनावट एटीएम कार्डचा वापर करून, एटीएममधून तीन कोटी 37 लाख 72 हजार 500 रुपयांची रक्कम काढून घेऊन, बॅंकांची फसवणूक केली होती. या गुन्ह्यांची माहिती घेऊन, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले. या प्रकरणाचे धागेदोरे कानपूरपर्यंत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा व म्हसवड पोलिसांच्या पथकाने कानपूर येथे सापळा रचून चार जणांना अटक केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे, हवालदार झेंडे, अजय जाधव, रवींद्र बनसोडे, नितीन धुमाळ यांनी ही कारवाई केली.संशयितांकडून चार मोबाइल हॅंडसेट, विविध बॅंकांची एटीएम कार्डस् जप्त करण्यात आली आहेत. या चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. संशयितांनी वापरलेल्या एटीएम कार्डांच्या आधारे 879 खात्यांची माहिती घेऊन, त्यामधील रक्कम गोठवण्यात आली आहे. त्यातून 86 लाख 45 हजार 600 रुपये वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी या कामगिरीबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.