मुंबई: एका हिंदी वृत्तवाहिनीने 13 मे रोजी टॉमेटोतून नवा तिरंगा विषाणू पसरत असल्याची बातमी प्रसारीत केली आहे, त्यामुळेच टॉमेटोचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळून शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
अशा खोडसाळ बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिनीवर कारवाई करून त्यांना त्वरीत शिक्षा देण्यात यावी व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी ट्विटरवर ही प्रतिक्रीया दिली असून हा संदेश त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयालाही पाठवला आहे. केंद्र सरकारने संबंधीत वृत्तवाहिनीवर कारवाई करणे अपेक्षित आहे तसे झाले नाही तर राज्य सरकारने या वाहिनीवर कारवाई केली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.
किमान एक महिना या वाहिनीचे प्रसारण बंद ठेवण्यात यावे असेही त्यांनी सुचवले आहे. विषाणू प्रसार किंवा करोनाच्या संबंधातील कोणतीही बातमी केंद्र सरकार किंवा आयसीएमआर कडून कन्फर्म करून घ्यावी, अशी खात्री करून घेतल्याशिवाय अशा स्वरूपाची कोणतीही बातमी प्रसारीत करण्यास माध्यमांना बंदी घालावी अशी सुचनाही त्यांनी केली आहे.