महिलांसाठी झटणारी “सावित्रीची लेक’
दिपाली शेळके यांच्या खास पैलुंवर “फोकस‘
विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लढा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या, राजकारणी, यशस्वीनी वेल्फेअर फाउंडेशनच्या संस्थपक अध्यक्षा सौ. दिपाली बाळासाहेब शेळके या महिलांच्या सबलीकरणासाठी आणि मुला-मुलींच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटत आहेत. तसेच मिळून साऱ्या जणी, घालू गनाला गवसणी’ या मंत्राप्रमाणे वाटचाल केल्यास कोणत्याही आव्हानाला आपण सामोरे जाऊ शकतो आणि प्रत्येक कामात यशही मिळतेच असे त्या ठामपणे सांगतात. त्यांच्याशी बोलताना त्यांच्या व्यक्तीमत्वातील आणि समाजकार्याबाबतचे अनेक पैलू समोर आले. या पैलुंवर खास महिला दिनानिमित्त प्रभात’ने टाकलेला फोकस’.
थोर समाजसेवक अण्णा हजारे, किरण बेदी, मेधा पाटकर, खासदार सुप्रिया सुळे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी समाजसेवेचा वसा घेतलेला आहे. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी केलेले महिलांचे मजबूत संघटन, पंचायत समिती, जिल्हा परिषद व विविध शासकीय कार्यालयातून रखडलेल्या नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मुख्यमंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, व विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देवून, प्रत्यक्ष भेटून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केलेले आहे.
निसर्गाचे रक्षण, शोषित-अन्यायग्रस्तांना मदत, होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, परित्यक्त्या, आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक महिलांच्या हक्कासाठी लढा देवून कित्येक महिलांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलविण्याचे त्यांनी केलेले कार्य, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन त्यांनी केलेली आंदोलने, स्वच्छ आणि सुंदर’ शहरीकरण, वृक्षारोपण, रस्त्यांच्या प्रश्नाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे त्यांनी केलेला पाठपुरावा यांसारख्या अनेक कार्यातून त्यांनी आपल्या समाजकार्याची चुणूक दाखविलेली आहे.
त्या म्हणतात, कुणीतरी महिलांच्या न्याय-हक्कासाठी पुढे आले पाहिजे या हेतूने मी समाजकार्यात उतरले. सामान्य कुटूंबात जन्म झाला. आई प्रमिला माणिक आढाव-वडील माणिक शिवराम आढाव यांच्या सुसंस्काराने समृद्ध झाले. त्यांच्या छत्रछायेखाली मोठी झाले. समाजसेवेचे बाळकडू त्यांच्याकडूनच मिळाले. पुढे सासरी आल्यानंतरही आई-वडिलांचे शिकवण विसरले नाही. रंजल्या-गांजलेल्यांची सेवा करताना जो आनंद मिळतो तो कशातच मिळत नाही. त्यातून पांडुरंगाच्या आणि संत सज्जनांच्या आशिर्वादाने समाजसेवेसाठी बळ मिळत गेले. बचत गटाची स्थापना केली आणि महिलांच्या सबलीकरणासाठी उभारलेल्या या रोपट्याचे वृक्षात रुपांतर झाले.
ज्यांना आर्थिक गरज होती त्यांना प्रसंगी पदरमोड करुन सहकार्य केले, उभे केले, सन्मानाने जगायला शिकविले. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून अनेक भगिनींच्या हाताला काम दिले. त्यांच्यातील आत्मविश्वासाची आणि बळाची जाणीव त्यांना करुन दिली. पुढे माझ्या बचत गटाबरोबरच मी अनेक महिलांना बचत गट स्थापन करण्यासाठी प्रेरीत केले. प्रथम महिलांना स्वावलंबी बनविले आणि हळू-हळू त्यांच्यात समाजकार्याची आवड निर्माण केली. समाजकार्य करताना अनेक अडचणी आल्या. समाजसेवेला राजकीय पाठबळ हवे असे वाटू लागले. माझ्या अनेक महिला भगिनींनी आग्रह केला आणि राजकारणात प्रवेश केला. यात खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर उभे केले अन् एकदा ठरले की माघार नाही हे आमचे तत्व. विशेष म्हणजे पंचायत समितीत 15 वर्षे अपक्षाचेच राज्य होत. मात्र, 2012मध्ये राजकीय पक्षाच्या (राष्ट्रवादी कॉंग्रेस) तिकिटावर आणि तीही महिला निवडून आली. या निवडणुकीत मला लाख मोलाची असंख्य महिला आणि युवकांची कार्यकर्त्यांच्या रुपाने एक मजबुत फळी मिळाली.
बचत गटातील उल्लेखनीय कार्य
* शिरूर येथे दोनदा यशस्वी शॉपिंग फेस्टेव्हल’. राज्यसतरीय बचतगटांच्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन. यात पाच दिवसांत दोन कोटींची उलाढाल.
* स्वाद महाराष्ट्रा’चा राज्यस्तरीय प्रदर्शनात (मुंबई) भरारी पथकाची प्रमुख जबाबदारी.
बचत गटांच्या वस्तूंना स्थानिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आहोरात्र प्रयत्न सुरू असतात.
* घरोघरी जाऊन वीज बिल वाटप
* पॅनकार्ड काढून देणे
* “सिरॅमिक पॉट’चे राज्यात-देशात कोठीही प्रदर्शन असल्यास महिला हिरारिने त्या ठिकाणी जातात. त्याठिकाणी या महिलांच्या कलेचे कौतुक होते.
* “व्हर्च्युाल’च्या माध्यमातून 646 महिलांना प्रशिक्षण तसेच 40 गावे 35 वाडया-वस्त्यांवरील महिलांचा यात सहभाग
* नाट्यपरिषद व बालरंभूमीवरील कार्य
* तालुकापातळीवर शिक्षकांसाठी बालनाट्य प्रशिक्षण कार्यशाळा
* पोलिसांसाठी ताण-तणावाच्या व्यवस्थापनाची कार्यशाळा
* बालनाट्यप्रशिक्षण, बालनाट्य प्रयोग
* ग. दि. माडगुळकर स्मृती नाट्य छटा स्पर्धेचे आयोजन
* सीसीआरटीची शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा
* गीत-गायन स्पर्धा
* पु. ल. देशपांडे राज्यस्तरीय नाट्यलेखन स्पर्धा
* चित्रकला स्पर्धा
* प. हृदयनाथ मंगेशकर पुरस्काराचे आयोजन
आगामी प्रकल्प
पालक समुपदेशन केंद्र आणि मूकबधिरांसाठी वधू-वर सूचक केंद्र मूकबधिर मुलांच्या पालकांना मार्गदर्शन मिळावं यासाठी लवकरच एक समुपदेशन केंद्र सुरू करण्याचा रामेश्वरी जाधव यांचा मानस आहे. तसंच मूकबधिरांसाठी स्वतंत्र वधू-वर सूचक केंद्र सुरू करण्याचं नियोजन पूर्ण झालं असून हा प्रकल्पही अल्पावधित पूर्ण करण्यात येणार आहे. शाळेबरोबरच विविध समित्यांवरही त्यांची निवड झालेली आहे. विविध शाळांच्या महिला दक्षता कमिटीशी त्या संलग्न असून विविध संस्थांशीही त्या जोडलेल्या आहेत. आगामी काळात मूकबधिर व दिव्यांग मुलांच्या पुनर्वसनासाठी प्रकल्प केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी प्रशिक्षण आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अस्तित्वात येणार आहे. रामेश्वरी यांनी त्या दिशेने पावले उचलली असून कंपनीच्या निर्मितीस प्रारंभ देखील केला आहे.
लग्नानंतर तब्बल 15 वर्षांनी घेतले उच्च शिक्षण
दिपाली शेळके यांचे लग्न 1193मध्ये पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथील बाळासाहेब शेळके यांच्यासोबत झाले. पण शिक्षणाची आवड आणि समाजसेवेला शिक्षणाचा आधार असावा तसेच म्हणतात ना शिक्षणाला वय नसते’ या युक्तीप्रमाणे मी 2015-16मध्ये एमएसडब्ल्यु’साठी प्रवेश घेतला. 2016-17मध्ये एमएची पदवी घेतल्याने खऱ्या अर्थाने कागदोपत्री समाजसेवी’ची पदवी प्रप्त केली. या शिक्षणासाठी पतीची मोलाची साथ मिळाली. त्यामुळे प्रत्येक पुरुषा मागे ज्या पद्धतीने स्त्री’ असे म्हटले जाते पण माझ्याबाबत उलटे म्हणावे लागेल आणि हे मी गर्वानेही सांगते की स्त्री’ मागे पुरुष’ असतो हे माझ्यावरून सिद्ध होते.
अपघाताने बचत गटात एन्ट्री’
दिपाली शेळके यांचे माहेर कोरेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जिल्हा नगर) येथील आहे. तर सासर पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथील आहे. त्यांना समाजकार्य करण्याचे बाळकडू लहनपणापासूनच मिळाले. हेच बाळकडू सासरच्या मंडळींच्या पाठिंब्याने कायम आहे. दरम्यान, 1993ला लग्न झाले. मग घरात नुसते बसण्यापेक्षा जिल्हा परिषद शाळेतील नाटके बसवणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपाययोजाना राबवणे असे काम करीत होत्या. त्यातच गावात बचत गटांच्या नाटकांच्या स्पर्धा भरवण्यात आल्या. त्यावेळी माझ्या नणंद यांचा बचत गटातील महिलांनी सहभाग घेतला होता. मात्र, नाटक कोण बसवणार हा प्रश्न पडला होता. तर मी शाळेमध्ये मुलांचे नाटक बसवते म्हणून मला बोलवण्यात आले. मी बचत गटांच्या महिलांचे नाटक बसवले व त्याला नंबरही मिळाला पण मी बचत गटाची सदस्या नसल्याचे प्रतिस्पर्ध्यांना लक्षात आले; त्यामुळे त्यांनी त्यावर अक्षेप घेतला. मात्र नंदेने पहिलेच माझे नाव बचत गटात घेतले होते, त्यामुळे आमच्या बक्षीसावर शिक्कामोर्तब झाले. मग तेव्हापासून बचत गटाचे काम करण्यास सुरुवात केली. अन् खऱ्या अर्थाने माला महिलांच्या सबलीकरणाची दिशा मिळाली.
संकलन
मुकुंद ढोबळे,
शिरूर तालुका प्रतिनिधी