गेली अडीच वर्षे अन्यायच
मंचर – शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती 2009 मध्येच “निश्चित’ झाली होती. तेव्हा संजय राऊत म्हणाले की, शरद पवार शिरूर लोकसभा लढवतील, तुम्ही मावळ लोकसभा लढवा. त्यामुळे उद्धव ठाकरेंची सभा तूर्तास आपण घेणार नाही. आपली युतीची बोलणी सुरू आहेत. मग मी म्हणालो आपले बोलणे सुरू आहे ना? मग दोन दिवसांनी शरद पवारांची सभा आहे, ती पण रद्द करायला सांगा. ते म्हणाले आता आपण त्यांना कसे काय सांगणार? मग मी म्हणालो, मला का सांगताय, असे म्हणून मी निघून आलो. काही वेळाने फोन आला, उद्धव ठाकरे येताहेत सभेची तयारी करा. मग त्याचवेळी मला शरद पवारांनी दोन वेळा राज्यसभेवर घेण्याची ऑफर दिली होती; मात्र मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सांगितले आणि त्यानंतर युतीचा प्रस्ताव फेटाळला गेला. आधी मावळ, आता पुणे नंतर बारामतीतून लढा म्हणाले असते; आज जी महाविकास आघाडी झाली ती 2009लाच झाली असती, असा आढळरावांचा गौप्यस्फोट माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी करून राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार तोफ डागली.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आढळराव पाटील यांनी लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील निवासस्थानी मंगळवारी (दि. 19) झालेल्या पहिल्या कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार शरद सोनवणे, अक्षय आढळराव पाटील, अरुण गिरे, देविदास दरेकर,सागर काजळे, सुनील बाणखेले, सचिन बांगर, भाऊसाहेब सावंत पाटील, रवींद्र करंजखिले, राम तोडकर, अशोकराव बाजारे, स्वप्नील बेंडे पाटील, संतोष डोके, प्रवीण थोरात पाटील, बी. टी. बांगर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
आढळराव म्हणाले की, राज्यात सत्तांतर झाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचे पाहून आम्हाला समाधान वाटले. आता आमच्या आणि शिवसैनिकांच्या जीवनाला कोठेतरी आधार आणि स्थैर्य मिळेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात लढण्याची ताकद मिळेल. पण दुर्देवाने, ज्यांच्याविरोधात मी सर्वस्व पणाला लावून संषर्घ केला, त्यांच्याबरोबर सरकार स्थापन झाले. आम्ही समजून घेतले, काही हरकत नाही. निदान आम्हाला आमचा वाटा मिळेल, आमची कामे होतील, आमच्या शिवसैनिकांना त्रास कमी होईल. पण, दुर्दैवाने तसे काहीही झाले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच अन्…
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच राहतील आणि सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालवतील, असेही आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीबरोबर जुळवून घेणे शक्य नाही
माझी हकालपट्टी जेव्हा झाली, त्या दिवसापासून सोशल मीडियावर शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेला सोडा अशा कमेंट्स येत आहेत. माझी हकालपट्टी झाल्यानंतर मी व्यथित होतो. त्यानंतर मला मुंबईला बोलविले. संजय राऊतानी सांगितलं की तुम्ही पुणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढावाल, त्यावेळेस मी सांगितले, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पुणे लोकसभा द्या, तर संजय राऊत म्हणाले ते राष्ट्रवादीवाले ऐकत नाहीत. ज्या पक्षाबरोबर मी अनेक वर्षे संघर्ष करीत आहे त्या पक्षाने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याबरोबर जुळवून घेणे आम्हाला जमणार नाही, असे आढळराव यांनी नमूद केले.