अॅडलेड – ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज (गुरुवार) भारत व इंग्लंड यांच्यात उपांत्य लढत होत आहे. तसे पाहिले तर भारतीय संघाची कामगिरी सामन्यानुसार उंचावलेली असली तरीही अंतिम फेरीत स्थान मिळवायचे असेल तर, सलामी व मधल्या फळीतील फलंदाजांना जास्त जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे.
या स्पर्धेत भारतीय संघाच्या फलंदाजीची सर्व जबाबदारी सूर्यकुमार यादव, विराट कोहली व काही प्रमाणात लोकेश राहुलने घेतली आहे. अर्थात राहुलची फलंदाजी ही संघासाठी बोनस ठरत असून मुख्य भार सूर्यकुमार व कोहलीवरच राहिला आहे. उपांत्य लढतीत मात्र, कर्णधार रोहित शर्मासह मधल्या फळीत फलंदाजी करत असलेल्या दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंत तसेच दीपक हुडा आणि हार्दिक पंड्या यांना अधिक जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे.
पंड्याने गोलंदाजीत सातत्याने बळी घेतले आहेत. मात्र, त्याच्याकडून अष्टपैलूची अपेक्षा होती त्यात तो फारसा यशस्वी ठरलेला नाही. त्याने या स्पर्धेपूर्वी झालेल्या मालिकांमध्ये सातत्याने धावा केल्या आहेत. आता उपांत्य सामन्यातही त्याच्याकडून मोठी खेळी होण्याची गरज आहे. तसेच गोलंदाजीत आपला संपूर्ण भार नवोदित अर्शदीप सिंग व पंड्या यांनीच वाहिली आहे. त्यांना अनुभवी भुवनेश्वर कुमार व महंमद शमी यांनी उपयुक्त साथ दिली आहे.
लक्षवेधी
– टी-20 विश्वकरंडकमध्ये आजवर दोन्ही संघात केवळ 3 सामने
– भारताने 2 तर इंग्लंडने 1 सामना जिंकला
– 2007 साली पहिल्यांदा झाला सामना
– युवराजच्या सहा षटकारांच्या वादळात इंग्लंडचा पराभव
– 2009 साली इंग्लंडची भारतावर मात
– 2012 साली भारताचा इंग्लंडवर विजय
– स्पर्धेच्या इतिहासात बाद फेरीत आज पहिल्यांदाच लढत
– एकूणच टी-20 इतिहासात दोन्ही संघात 22 सामने
– भारताचा 12 सामन्यांत तर इंग्लंडचा 10 सामन्यांत विजय
खरेतर या अनुभवी गोलंदाजांनीच प्रमुख कामगिरी करणे आवश्यक आहे. इंग्लंडची फलंदाजी गोलंदाजीपेक्षा जास्त सशक्त आहे. त्यांचा सलामीवीर जोस बटलर याला कसे रोखायचे हा मुख्य प्रश्न भारतासमोर राहणार आहे. त्यासाठी वेगवान गोलंदाजीपेक्षा पिरकीची मदत निर्णायक ठरेल असे खेळपट्टीची पाहणी केल्यावर दिसून येत आहे.
इंग्लंडबात बोलायचे झाले तर त्यांची गोलंदाजी भारतीय फलंदाजांना रोखेल का असाही प्रश्न आहे. सॅम कुरेन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदील रशीद व मोईन अली यांनी चांगली कामगिरी केली असली तरीही त्यांना भारतीय संघाला दीडशतकी धावांत रोखायचे असेल तर सूर्यकुमार व कोहली यांना लवकर बाद करावे लागणार आहे. तसेच त्यांच्या बटलरसह बेन स्टोक्स, अलेक्स हेल्स, हॅरी ब्रुक्ससह सर्व फलंदाजांनाही भारताच्या संमिश्र गोलंदाजीसमोर आक्रमक फलंदाजी करावी लागेल.
पंड्याच्या कामगिरीकडे लक्ष
भारतीय संघात तसे पाहिले तर एकच अष्टपैलू खेळाडू आहे तो म्हणजे हार्दिक पंड्या. काही सामन्यांत रवीचंद्रन अश्विनने गोलंदाजीसह फलंदाजीतही चमक दाखवली. मात्र, पंड्यावर जास्त जबाबदारी राहणार आहे. त्याची वादळी फलंदाजी तसेच अचूक गोलंदाजी भारतासाठी सातत्याने लाभदायक ठरली आहे. या सामन्यातही पंड्याची जादू चालली तर भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी फारसे झगडावे लागणार नाही.