पुणे – महापालिकेतील सदस्यांची मुदत संपल्यानंतर प्रशासक म्हणून आयुक्तांकडे कारभार आला. यानंतर विकासकामांबाबत निर्णय घेण्यासाठी प्रशासक विक्रम कुमार पहिलीच बैठक घेणार आहेत. बैठकीचे प्रस्ताव विभाग प्रमुखांकडून नगरसचिव विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. नगरसचिवांकडून ते आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवले जाणार आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
नवी मुंबईच्या धर्तीवर होणार कामकाज
दरम्यान, 15 मार्च रोजी महापालिकेवर प्रशासक नेमल्यानंतर कामकाज कसे असावे, याबाबत राज्यशासनाकडे मार्गदर्शक सूचना मागितल्या होत्या. मात्र, त्याबाबत काहीच प्रतिसाद आलेला नाही. त्याचवेळी आधी प्रशासक नियुक्त झालेल्या पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकेकडे कामकाजाची विचारणा केली होती. त्यात, काही महापालिकांनी नियमित कामकाजाप्रमाणेच समित्यांची जबाबदारी अधिकाऱ्यांकडे दिली आहे.
या समित्यांमधून प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेसाठी येत आहेत. तर नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव नगरसचिव विभागाकडे घ्यायचे आणि नंतर आयुक्तांकडे मान्यतेसाठी ठेवायचे, अशी कार्यपद्धती स्वीकारली आहे. त्याच धर्तीवर पुणे महापालिकेचे कामकाज चालणार आहे.
महापालिकेवर प्रशासक आले, म्हणून प्रशासनाची जबाबदारी बदललेली नाही. उलट अधिक काटेकोरपणे कामे करावी लागणार आहे. शहरातील जुने प्रकल्प पूर्ण करून घेण्यावर भर राहणार आहे. शहर स्वच्छता, समान पाणीपुरवठा, 11 गावांचा मैलपाणी शुद्धीकरण प्रकल्प, नदी शुद्धीकरण प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू करणे, उड्डाणपुलांचे काम वेळेत पूर्ण करणे, रस्ते व इतर आरक्षणांचा विकास करण्यासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती देणे यासह इतर प्रकल्पांचा समावेश आहे.
– विक्रम कुमार, प्रशासक,मनपा