महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील सामना आता चांगलाच रंगात आलेला दिसतो आहे. या सामन्यात आतापर्यंत केवळ भाजपकडूनच एकतर्फी रंग भरला जात असे. महाविकास आघाडीतील नेते होताहोईल तो संयमच बाळगताना दिसत असत. शिवसेनेतर्फे एकटे संजय राऊत हे एकाकी किल्ला लढवताना दिसत होते. पण आता यात खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे नेतेही हिरीरीने उतरल्याने ही रंगत वाढली आहे.
अर्थात, राज्यकारभार करणे किंवा एकूणच राजकारण हे काही मनोरंजनाचे साधन असू शकत नाही, पण भाजपने त्याला तसे स्वरूप दिल्यानंतर समोरची माणसे तरी किती गप्प राहणार हा मुद्दा होताच. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच दिवसांच्या मौनानंतर भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे. एकाच भाषणात त्यांनी सगळेच मुद्दे घेऊन भाजपला पुरते घायाळ केले आहे, इतके की कोणत्याही विषयावर लगेच भाष्य करणारे भाजपचे नेते कालच्या भाषणावर तितक्या तत्परतेने बाहेर आलेले दिसले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या ठणकावून बोलण्याच्या भाषेचा हा परिणाम असावा. ठाकरेंना या भूमिकेप्रत आणण्यासही भाजपच कारणीभूत ठरली आहे, असे येथे नमूद करावेच लागेल.
उद्धव ठाकरे यांचा उल्लेख “जनाब उद्धव ठाकरे’ असा करून भाजपने ही आफत ओढवून घेतली आहे. शिवसेनेला “मुस्लीम सेना’ म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेल्यानंतर ठाकरे शांत राहणे शक्यच नव्हते. भाजपने शिवसेनेच्या शेपटावरच पाय दिल्याने त्यांचे नेतृत्व चवताळून उठले आणि त्यांनी भाजपची काल अक्षरश: पिसेच काढलेली पाहायला मिळाली. “शिवसेना अंगार आहे हे त्या भंगारांना दाखवून द्या, निखाऱ्यावरची राख आता झटकून टाका’ अशा शब्दांत त्यांनी भाजपशी दोन हात करणे सुरू करा, असा आदेश शिवसैनिकांना दिला आहे. त्यामुळे राजकीय सामन्यातील ही रंगत आता दिवसागणिक वाढतानाच दिसणार आहे.
आजवरचे महाराष्ट्रातील राजकारण हे सुसंस्कृत स्वरूपाचे होते. त्यात खेळीमेळी आणि विनोदाचेही वातावरण असायचे. हे वातावरण अलीकडे फारच गढूळ झाले आहे. संजय राऊत यांनी हा मुद्दा उपस्थित करताना राज्यातील समजुतीचे आणि सलोख्याचे राजकीय वातावरण बिघडवण्याचे काम भाजपनेच केले आहे, असे नमूद केले आहे. त्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे. भाजपचे काही ठराविक नेते रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ दूरचित्रवाणी वाहिन्यांवर येऊन काहीबाही बोलताना दिसतात. त्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना डिवचण्याचाच भाग अधिक असतो हे खरे आहे. मग समोरचाही डिवचला जातो आणि तो खरपूस समाचार घेतो. कालच्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणात हाच प्रत्यय आला.
हिंदुत्वाचा मक्ता केवळ आपणाकडेच आहे असे सध्या जे भाजपकडून भासवले जात आहे त्यावर प्रखर हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेकडून प्रत्युत्तर न आले तरच नवल. सध्याच्या उन्मादी धार्मिक वातावरणाला काश्मीर फाइल्स नावाच्या एका चित्रपटाची पार्श्वभूमी आहे. काश्मिरात संघ-भाजपकडून ज्या पीडीपी पक्षाला देशद्रोही असे आजवर संबोधले जात होते त्याच पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्याशी भाजपने युती करून जम्मू-काश्मिरात सरकार स्थापन केले होते. त्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर शरसंधान साधले. त्यासाठी त्यांनी विशिष्ट असा शब्दप्रयोग वापरला आहे. मेहबुबा मुफ्तींशी मांडीसलगी करताना तुमचे हिंदुत्व कोठे गेले होते? पंतप्रधान मोदी नवाज शरीफांच्या वाढदिवसाला न बोलावता पाकिस्तानात कसे गेले होते व तेथे त्यांनी एकमेकांना केक कसा भरवला, जिनांच्या कबरीवर माथा टेकण्यासाठी कोण गेले होते, असे प्रश्न उपस्थित करीत ठाकरेंनी संघ-भाजपच्या हिंदुत्वाच्या दाव्याची चिरफाड केली.
भाजपचे हिंदुत्व हे राजकीय स्वरूपाचे हिंदुत्व आहे खऱ्या हिंदूधर्माशी त्यांना काहीही देणेघणे नाही, असे त्यांच्या म्हणण्याचा रोख होता. एमआयएम नावाच्या पक्षाने महाविकास आघाडीशी युती करण्याचा प्रस्ताव दिला आहे त्यावरून हा मामला अधिक तापला आहे. हा प्रस्ताव देण्यामागेही भाजपचेच कारस्थान होते, असा आरोपही ठाकरेंनी केला असून त्यांनी एमआयएम या पक्षाशी भाजपचीच कशी आतून हातमिळवणी सुरू आहे यावरही त्यांनी भाष्य केले आहे. या साऱ्या घटनाक्रमावर आता भाजपच्या नेत्यांनीही नीट उत्तरे दिली पाहिजेत. शिवसेनेचे समर्थक आता सोशल मीडियावरही आक्रमक झाले आहेत. त्यांनीही स्वातंत्र्यापृर्वी हिंदूमहासभा आणि बॅरिस्टर जिना यांनी तीन राज्यांमध्ये जे संयुक्त सरकार स्थापन केले होते यावरून टीकेची झोड उठवली आहे.
संघाने काश्मीरचे जननायक म्हणून मिरवले गेलेले श्यामाप्रसाद मुखर्जी हे मुस्लीम लीगच्या मंत्रिमंडळात कसे मंत्री होते त्याचाही दाखला शिवसेनेकडून दिला जाऊ लागला आहे. आम्ही खाल्ले तर ते शेण आणि तुम्ही खाल्ले तर ते श्रीखंड, अशा भाषेत शिवसेनेकडून भाजपला उत्तर दिले गेले आहे. आतापर्यंत शिवसेना गप्प बसली होती, आता भाजपच्या विरोधात ती सरसरून बाहेर पडणार अशीच ही सारी लक्षणे आहेत. दरवेळी इतिहासाच्या खपल्या काढायच्या आणि अनामिक भीती दाखवायची हा डाव आपण हाणून पाडला पाहिजे, असा स्पष्ट आदेशही त्यांनी शिवसैनिकांना दिला आहे. या सगळ्या धांदलीत राज्यातील नागरिकांचे विषय आणि केंद्र सरकारची नेमकी जबाबदारी हे सारे विषय मागे पडत आहेत. सामान्य जनता आवाकपणे हा सारा प्रकार पाहात आहे. त्यांना आपल्यापुढील मूलभूत समस्यांचे काय होणार, हा प्रश्न सतावत आहेत. देशातील गरिबीचे प्रमाण अतोनात वाढले आहे, बेरोजगारी आणि महागाईचा दर कळसावर पोहोचला आहे.
जागतिक भूक निर्देशांकांत आणि हॅपिनेस निर्देशांकांत भारत खूप मागे पडला आहे. आफ्रिकेतील गरीब देश आणि आपल्या शेजारील पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे गरीब देशही या दोन्ही निर्देशांकांत वरचे स्थान मिळवताना जेव्हा आपण पाहतो त्यावेळी आपल्या देशाच्या सद्यस्थितीचे चित्र आपल्यापुढे उभे राहते. पण याकडे लक्ष द्यायला आज कोणाला वेळ आहे. जो तो काश्मीर फाइल्समध्ये गुंतला आहे. त्यामुळे या साऱ्या स्थितीवर अचंबित व्हायचे की सत्ताधारी आणि विरोधकांतील राजकीय आतषबाजीने आपली करमणूक करून घ्यायची हे ज्याच्या त्याच्या इच्छेवरच सोडून दिलेले बरे. देशापुढील मूलभूत समस्यांवर गांभीर्याने चिंता करण्याचा काळ आता राहिलेला नाही ही खंत मात्र समजूतदारांना सतावतच राहणार आहे.