विश्वाभासं हृदयपटले गोचरं यस्य नित्यं l
ब्रम्हानंदी सतत निरतस्ततत्परो ज्ञानदाने ll
विख्यातो य: सुगमकथे ज्ञानदेवस्य वाक्यं l
शान्ताराम परमसदयं सद्गुरूं तं भजेsहम् ll
वै.गु.शांताराम गुरुजींचा जन्म कोकणातील वेंगुर्ले या गावी १९०५ साली झाला गुरुजींचे वडील महादेव सगुन कांबळे हे मोठे पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर होते उद्योगधंद्या निमित्त यांचे बरेचशे आयुष्य मुंबईतच गेले आर्थिक परिस्थिती उत्तम पैशांची आवक ही सातत्याने होत असे पण पैशाचा विनियोग करण्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही आपल्या पश्चात मुलाबाळांचे कसे होईल याचा विचार केला नाही. आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे गुरुजींचे बालपण सुखात गेले गुरुजी वेंगुर्ल्याच्या जॉर्ज इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होते मराठी, संस्कृत व इंग्रजी या विषयात त्यांची विशेष रुची होती.
त्यांची गणना हुशार विद्यार्थ्यांमध्ये होत असे, गुरुजी १०/१२ वर्षाचे असताना त्यांच्या घरी एके दिवशी एक साधुपुरुष भिक्षेस आले असता गुरुजींच्या कडे पाहून ते आईला म्हणाले हा तुमचा मुलगा फार मोठा होईल पण तुमच्या संसाराला त्याचा काहीच उपयोग होणार नाही विचारमग्न अवस्थेत आईने साधूंना भिक्षा दिली .साधू भिक्षा घेऊन निघून गेला.
१९२० सालाच्या आधी ची गोष्ट गुरुजींच्या लहानपणी त्यांच्या गावी पंढरपूरचे जयराम स्वामींचे मठाधिकारी तुकाराम महाराज येत असे सोबत भालदार चोपदार वगैरे लवाजमा असे तो रुबाब पाहून सहजच तेथील अनेक बालमने त्यांच्याकडे आकर्षिली गेली, गुरुजी व अनेक मित्रांनी त्यांच्याकडून तुळशीच्या माळा घातल्या १/२वर्षांनी इतरांच्या माळा गायब झाल्या पण गुरुजींची माळ कायम टिकली. लहानपणापासूनच त्यांचा भक्तिमार्गाकडे ओढा होता विद्यार्थी असतानाच त्यांचे गीतेचे अध्याय मुखोद्गत होते. माळ घेऊन जप करणे हा त्यांचा छंदच.
वेंगुर्ल्यात १९२५/२६ च्या दरम्यान गीता जयंती उत्सव झाला त्यात गुरुजींनी गीता पाठांतर आत प्रथम क्रमांक मिळविला. १९२६ साली गुरुजींचे पितृछत्र हरपले ,घरातील कर्ता पुरुष गेला आणि घरातील सर्व जबाबदारी अचानक गुरुजींवर आली.
१९२७-२८ मध्ये मुंबईस येऊन गुरुजी पहिल्यांदा मॅट्रिकच्या परीक्षेत बसले घरातील दुःखाचा परिणाम त्यांच्या मनावर झाल्यामुळे एवढे हुशार असूनही दुर्देवाने ते या परीक्षेत नापास झाले.दुसऱ्या वर्षी पुन्हा परीक्षेत बसले परंतु लहान वयात आलेल्या जबाबदारीमुळे ते याही परीक्षेत नापास झाले.
मग त्यांनी परीक्षेचा नाद सोडला,नोकरी स्वीकारली नोकरीतही त्यांना यश आले नाही.या काळातही त्यांनी माळ आणि गीता सोडली नाही. शेवटी कोणालाही सुगावा लागू न देता १९३० साली खिशात असलेले थोडेफार पैसे टेबलावर ठेवून फक्त अंगावरची वस्त्रे आणि नेहमी जवळ असलेली गीता व माळ घेऊन भायखळा स्टेशनवर आले मनात काहीतरी विचार आला पुन्हा कल्याण स्टेशनवर उतरून बाहेर पडले व मिळेल त्या वाटेने पुढे चालू लागले. बरीच रात्र झालेली एका जंगलातून ते चालवत होते, जंगलामध्ये एकाएकी पेटती मशाल घेतलेला एक मनुष्य समोर आला व त्याने विचारले एवढ्या रात्री कुठे चालला आहेस ? शहरात निघालोय वाट चुकलो आहे!
या दिशेने जाऊ नकोस पुढे घनदाट जंगल आहे . मी तुला एक मंदिर दाखवतो रात्रभर तिथे रहा उजाडल्यावर शहरात जा ! त्याने देवळापर्यंत सोबत केली आणि एकाएकी तो दिसेनासा झाला. दुसऱ्यादिवशी गुरुजी कल्याण स्टेशनवर घेऊन पुण्याच्या गाडीत चढले व पुण्यात उतरून आळंदी चा मार्ग विचारीत पायी आळंदीला पोहोचले आळंदीत कोणाचीही ओळख नाही. त्यात त्यांचा भिडस्त स्वभाव शेवटी आळंदीत पुढे काही जमेना तेव्हा आळंदीहून बाहेर पडताना पुण्याच्या रस्त्याच्या बाजूला माऊलींच्या ज्या पहिल्या पादुका लागतात (धाकट्या पादुका) तेथील एका मोठ्या घरात ते राहू लागले अन्नपाण्याविना १५ दिवस त्यांनी तेथे वास्तव्य केले शेवटी प्राण जाण्याची वेळ आली आता येथे पडून मरण्यापेक्षा इंद्रायणीत आपला देह विसर्जित करू असे ठरवून ते पहाटे जीव देण्यासाठी इंद्रायणी वर आले. त्यावेळी वै.गु. मारुती बुवा गुरव पहाटे इंद्रायणी वर स्थानाला येत असत त्यांनी गुरुजींना पाहिले विचारपूस केली आणि त्यांना माऊलींच्या मंदिरात आजन वृक्षाखाली ज्ञानेश्वरीची पारायणे करायला सांगितले.
वै.मारुती बुवा यांच्या आज्ञेने ज्ञानेश्वरी पारायण झाल्यानंतर मारुती बुवांनी त्यांना संस्थेत दाखल करून घेतले बुवा त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करीत असत गुरुजींनी शिष्याच्या नात्याने राहून मारुती बुवा यांच्या सानिध्यात दीडवर्षात ज्ञानेश्वरी व विचारसागर या ग्रंथांचा अभ्यास केला.
पुढे सन १९३४ साली मारूती बुवांनी त्यांना पंढरपूर येथे वै.गु.बंकट स्वामींकडे ज्ञानेश्वरीच्याअध्ययनासाठी पाठविले.इ.स.सन १९३५-३६ साली वै.गु. मामासाहेब दांडेकर यांच्याकडे अमृतानुभ व गीताभाष्य या ग्रंथांचे अध्ययन केले.
त्याच प्रमाणे चातुर्मासा मध्ये राहून वै.एकनाथ महाराज देगलूरकर , वै. धुंडा महाराज देगलूरकर ,वै.धारुरकर शास्त्री इ.मंडळींकडे ब्रह्मसूत्र,उपनिषदादी वेदांत ग्रंथांचा चांगला अभ्यास केला तसेच वै.गोपाळ शास्त्री गोरे यांच्याकडे सर्व दर्शन संग्रह या ग्रंथांचे श्रवण ही केले.
वै.धुंडा महाराजांच्या सोबत प्रवास करून त्यांनी वृत्तीप्रभाकर व सिद्धांतबिंदू हे ग्रंथ श्रवण केले.
या नंतर गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण म्हणून रुजू झाले. त्यांची शिकवण्याची उत्तम हातोटी व प्रेमळ स्वभाव त्यामुळे सर्व जण त्यांना गुरुजी म्हणतात.
गु.मारोती बुवांचे त्यांच्या वर फार प्रेम होते. ते नेहमी म्हणत असत ” माझा शांताराम माझ्या पश्चात योग्यप्रकारे संस्था चालविली.आता मी निर्धास्त झालो ! ” गुरुजींची गुरुनिष्ठा आहे अपार कमालीची होती.मारोती बुवांच्या नंतर इ.स.१९४५-४७ पर्यंत ते वारकरी शिक्षण संस्थेचे चिटणीस व शेवटपर्यंत कार्यकारी सभासद होते.
गुरुजी कार्तिकी वारी तेआषाढी वारी पर्यंत आळंदी मध्ये संस्थेत शिकवत असत. त्यानंतर पंढरपूर येथे चातुर्मासात श्री नामदेव मंदिरात राहत असत. पहाटे उठून रोज चंद्रभागेचे स्नान त्यानंतर देवदर्शन नगरप्रदक्षिणा या गोष्टी आळंदीत असो वा पंढरपुरात असो कधी चुकत नसत अध्ययन आणि अध्यापन हेच गुरुजींचे जीवन होते. शेवटपर्यंत पंढरी निवासी पंडित प्राण धारूरकर शास्त्री यांच्याकडे अद्वैत सिद्धि, भामतीनिबंध ,अद्वैत मकरंद आधी ग्रंथांचे श्रवण करून चातुर्मासात राहिलेल्या विद्यार्थ्यांना या ग्रंथांचा व वेदांत शास्त्राच्या अन्य ग्रंथांचा ते पाठ देत असत.
संस्थेच्या कार्याबरोबरच त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार मुंबई,ठाणे,पुणे, दौंड ,जुन्नर, जत,खानदेश, वऱ्हाड,इ. ठिकाणी कीर्तन प्रवचना द्वारे केला. फलटण सारख्या अनेक भागांमध्ये जाऊन ज्ञानेश्वरी सांगितली वै.गु.भाऊसाहेब वरोलीकर आणि गुरुजींची दाट मैत्री होती दोघेही सुशिक्षितअसल्याने त्यांच्या वागण्यात ,बोलण्यात नीटनेटकेपणा होता. दोघांनाही उत्तम इंग्रजी येत होती किंबहुना ते एकमेकांशी इंग्रजी भाषेत संवाद करीत असत. गुरुजी दर शुद्ध एकादशी ला देहूची पायी वारी करत असे रक्तदाबा मुळे त्यांना त्रास होऊ लागला तेंव्हा ते नेहमी म्हणायचे ” मी संस्थेचे अन्न फुकट खातो , खरे मी राजीनामा देणेच उचीत आहे.आजार पणा मुळे मला संस्थेची सेवा करता येत नाही पण माझे आयुष्य थोडे राहिले आहे ! “असे ते तळमळीने बोलत असत कोणी पाहुणा आला तर त्याची जेवणाची व्यवस्था ते स्वतः करीत असत इतक्या निस्पृह वृत्तीने ते वागले पैसा मिळवायची त्यांच्यात धमक असतानाही त्याकडे त्यांनी पाठवली.
आजारी असताना खर्चाची टंचाई भासू लागली की त्यावेळी जवळ असणाऱ्या विठ्ठल महाराजांना ते म्हणत की , ” जोपर्यंत आपले तोंड चालू असते तोपर्यंत लोक विचारत असतात पण नंतर कोणीच विचारत नाही! “असे औदासिन्याने बोलत असत.
अश्यावेळी देवाने श्री.गणपतराव सारंग यांना प्रेरणा दिली असावी त्यांनी ती अडचण दुर केली.
गुरुजी कीर्तन प्रवचना साठी गावोगावी फारसे फिरले नाही पण ज्या ठिकाणी जात तेथे कधी पैश्याची याचना केली नाही त्या मुळे शिल्लकीचा प्रश्न च आला नाही जी काही थोडीशी रक्कम होती ती संस्थेतच जमा केली होती.आजारी पडल्या नंतर ते फक्त प्रवचने करीत.मामांनी त्यांना बसून कीर्तन करण्याची आज्ञा दिली.पण त्यांनी ती मान्य केली नाही
“निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म l निर्धार हे वर्म चुको नये ll”
शेवटच्या आजारपणात भिवराबाई जाधव यांनी गुरुजींचे पथ्य पाणी सांभाळले शेवटी शेवटी तुकारामांच्या विराण्यावर लिखाण सुरू होते ७/८ अभंग लिहिले पण आजारपणा मुळे ते काम अपूरे राहिले.
वेंगुर्ल्याचे लोक सांगायचे तुम्ही वेंगुर्ल्याला या,गु.मामांकडे ती ती मंडळी निरोप सांगत असत पण ते घरी गेले नाहीत आपला देह पंढरपुरात पडावा अशी त्यांची इच्छा होती. पंढरपूरची वारी कधी चुकवू दिली नाही काही दिवसांनी रोगाचे बळ वाढत गेले शरीरातील शक्ती कमजोर झाली त्यामुळे त्यांची पंढरीची आषाढीची वारी एकदा चुकली त्यामुळे पुढील वर्षी असे होऊ नये म्हणून अगोदरच आठ दिवस ते पंढरीला आले हि वारी झाल्यावर गुरुजींची तब्येत बिघडली तरीपण श्री नामदेव मंदिरात नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या वेळी आषाढ शुद्ध द्वादशीला “अनन्याश्चिन्तयन्तो माम् ” या श्लोकावर २० मिनिटे त्यांनी प्रवचन केले.
दुसरा दिवस समाधी सोहळ्याच्या काल्याचा दिवस काला प्रसाद गुरुजींनी सेवन केला सायंकाळी ७ च्या पुढे त्यांची तब्येत बिघडली त्यावेळी काही मंडळी डॉक्टरांच्या सल्ल्यावरून म्हणू लागले की यांना पंढरपुराहून पुण्याला हलवा, पुण्यास नेण्याचे ठरले त्या वेळी सेवेकरता जवळ असणाऱ्या विठ्ठल बुवांना गुरुजी म्हणाले ” विठ्ठल काही झाले तरी मला इथून कुठे नेण्याचे करू नका कारण माझी मनापासून इच्छा आहे की माझा देह आळंदी किंवा पंढरपूरला पडावा तेव्हा जर आता मला नेण्याचे ठरविले तर मध्ये रस्त्यातच कुठेतरीदेहावसान होईल म्हणून मला अजिबात कोठेही ठेऊ नका मामा जरी आले तरी त्यांना सांगा! ” त्याप्रमाणे त्यांना पुण्यास घेण्याचे रद्द केले त्यावेळी रात्रीचे ९:३० वाजले होते विठ्ठल बुवांनी नामस्मरणाचा जप सुरू केला बरेच मंडळी बाहेर शांतपणे चिंतन करत बसले होते अशावेळी रात्री ११ वाजता विठ्ठल म्हणून मोठ्याने हाक मारली तसेच त्या हाकेसरशी पंढरीच्या विठ्ठलाने गुरुजींना आपल्या स्वरूपात विलीन करून घेतले.
गुरुजींच्या अंत्ययात्रेला स्वतः मामा आले होते त्यावेळी मामानी गुरुजीं विषयी काढलेले उद्गार लक्ष्मण बुवा, मारुतीबुवा जायचे होते पण शांताराम बुवा माझ्या मागून आले पण सर्व विद्यार्थी वर्गाकडून गुरुजी ही सार्थ पदवी घेऊन माझ्या पुढे गेले मलाही त्यांचा हेवा वाटावा नाहीतर गुरु शिष्य असतात मरका गुरू रडका चेला देहिचा बोध वाया गेला
मरण येणारच पण उत्तमची उरे किर्ती मागे हे खरे माप.
वै.गु प्रात:स्मरणीय ह.भ.प.शांताराम गुरुजींच्या चरणीं विनम्र अभिवादन.
संदर्भ- शातमृतधार
(शब्दांकन : स्वानंदकिंकर-उमेश बागडे)