-माधव विद्वांस
पथनाट्य नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, गीतकार आणि विचारवंत सफदर हाशमी यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 12 एप्रिल 1954 रोजी दिल्ली येथे झाला. त्यांचे लहानपण अलिगढ आणि दिल्ली येथे गेले. त्यांचे शिक्षण दिल्ली येथे झाले. त्यांच्या घरातच साम्यवादी विचारसरणी रुजलेली होती.
दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून इंग्रजीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्रजीतून एमए केले. या कालावधीत ते भारतीय कम्युनिस्ट विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेच्या स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या सांस्कृतिक युनिट बरोबर जोडले गेले होते. त्यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) आणि आणखी एका इंग्रजी वृत्तपत्रात पत्रकार म्हणूनही काम केले. पश्चिम बंगाल सरकारच्या दिल्ली कार्यालयात माहिती अधिकारी म्हणूनही काम केले.
त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वर्ष 1973 मध्ये “जन नाट्य मंच’ची स्थापना केली. वर्ष 1979 मध्ये त्यांनी थिएटर अभिनेत्री कॉम्रेड मोलोयश्री यांचेशी विवाह केला. या दोघांनी मिळून अनेक पथनाट्ये सादर केली. जनमंच ही संस्था सीआयटीयूसारख्या कामगार संघटनांशी संबधित होती. तसेच त्यांचा विद्यार्थी, महिला, तरुण, शेतकरी इत्यादींच्या चळवळीतही सक्रिय भाग होता. त्यांच्या योगदानाच्या उल्लेखाशिवाय भारतातील पथनाट्य चळवळीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही.
जवळपास 4 हजार पथनाट्यांचे प्रयोग त्यांनी केले. नाटकांचे विषय सामाजिक असायचे. त्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, गिरणी कामगार,महिलांवरील अत्याचार, जातीय सलोखा हे विषय केंद्रबिंदू असत. सामाजिक प्रश्नांची उकल करणे, अन्यायाला वाचा फोडणे असे विषय असल्याने सर्वसामान्य लोक हे नाटक बघण्यासाठी मोठ्या संख्येने येत असत. वर्ष 1975 पर्यंत जनमंचने प्रेक्षकांसाठी मैदानावर खुली तसेच रस्त्यावर पथनाटके सादर केली.
पुढील काळात त्यांनी गढवाल, काश्मीर आणि दिल्लीतील विद्यापीठांमध्ये इंग्रजी साहित्याचे व्याख्याता म्हणून काम पाहिले. त्यांनतर सफदर राजकीदृष्ट्या सक्रिय झाले. वर्ष 1978 नंतर जनमंचने उभारी घेतली. दोन लाख कामगारांच्या प्रचंड मेळाव्यासमोर “मशीन’ या नवीन नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर बरीच नाटके झाली ज्यात प्रामुख्याने “गावसे शहर’ या नाटकात संप्रदायता हा विषय होता, तर बेरोजगारीवरील “तीस लाख’ हे नाटक, घरगुती हिंसाचारावर आधारित “औरत’, महागाईवरील “डीटीसीची रिग’ ही प्रमुख नाटके होती.
वर्ष 1984 पर्यंत ते नोकरी सांभाळून जनमंचचे काम करीत होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला व पूर्ण वेळ नाटक व राजकारणाकडे वळले. त्यांनी दूरदर्शनसाठी “खिलती कलियॉं’ या मालिकेची निर्मिती केली. लहान मुलांसाठी त्यांनी पुस्तके लिहिली. त्यांनी मॅक्सिम गार्की यांच्या नाटकावर आधारित “दुश्मन’ आणि हबीब तनवीर यांच्याबरोबर प्रेमचंद यांची कथा “मोतीरामांचा सत्याग्रह’ या दोन उत्कृष्ट नाटकांच्या निर्मितीस हातभार लावला.
1 जानेवारी 1989 रोजी दिल्लीला लागून असलेल्या साहिबाबादच्या झांदापूर गावात गाझियाबाद नगरपालिका निवडणुकीच्या वेळी “हल्ला बोल’ या पथनाट्य नाटकावर हल्ला झाला. त्यावेळी जनमंचच्या गटावर प्रतिस्पर्धी गटाने हल्ला केला. सफदर या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले, पण 2 जानेवारी 1989 रोजी त्यांच्या जीवनावर अखेरचा पडदा पडला.