मुंबई : मुंबईतील करोना परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र, गुरुवारी रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. मुंबई एकाच दिवसात ८ हजार ६४६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. अचानक रुग्णसंख्येचा आलेख चढत गेल्याने प्रशासन चांगलेच सर्तक झाले आहे. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी मोठे निर्बंध लावण्याचे संकेत दिले आहेत.
मुंबईत गुरुवारी ८ हजार ६४६ नवीन रुग्ण आढळून आले व १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५५ हजार ५ रुग्ण उपचार घेत आहेत. अचानक रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने प्रशासनानं निर्बंध कडक करण्याचा विचार सुरू केला आहे. तसे संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.
करोना संक्रमणाचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी काही कडक निर्बंध लागू केले जाऊ शकतात, असं महापौरांनी म्हटलं आहे. रेस्तराँ ५० टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर लोक जर योग्य प्रतिसाद देत नसतील, तर धार्मिक प्रार्थनास्थळेही बंद करण्यात येतील,” असं महापौर म्हणाल्या.
“मुंबईतील लोकल प्रवासावरही निर्बंध आणले जाऊ शकतात. पूर्वीप्रमाणेच फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासासाची मूभा दिली जाऊ शकते. त्याचबरोबर लोकांकडून करोना नियमावलीचे पालन केले जात नसल्याने मॉल्स आणि थिअटर बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो,” असेही महापौर पेडणेकर यांनी यांनी सांगितले. नव्या निर्बंधासंदर्भात २ एप्रिल रोजी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.