पुणे – शहरात लॉकडाऊन लागू करायचा की निर्बंध अधिक कडक करायचे, याचा निर्णय शुक्रवारी (दि.2) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत होणार आहे. याबैठकीस महापौर, खासदार, आमदार यांना सुध्दा आमंत्रित करण्यात आले आहे.
विधानभवन येथे शुक्रवारी सकाळी ही बैठक होणार आहे. मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे सांगत पवार म्हणाले की, पुढील आठ दिवसांत शहरातील रुग्णसंख्या कमी झाली नाही तर नाईलाजास्तव लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल.
अशीच रुग्णवाढ होत राहिल्यास कितीही इच्छा नसली तरी लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील दुकाने रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसेच, रात्रीची संचारबंदी लागू केली. यासह हॉटेल, मॉल, चित्रपटगृहे सुद्धा 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचे आदेश दिले.
शाळा, महाविद्यालये 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे सूचना दिल्या. या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली तरी करोना बाधितांच्या संख्येमध्ये अपेक्षित बदल दिसून येत नाही. करोना बाधितांच्या संख्येने आठवड्यात तीनदा चार हजारांचा टप्पा पार केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.