मुंबई : राज्यातील सत्तांतराने सर्वच राजकीय समीकरणाने बदलली आहेत. त्यातच कालच्या धुळवडीच्या निमित्ताने सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर खोचक शब्दातील टीकांचे रंग उधळले असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आता या टीकेमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी,”महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आलं आहे हे सगळ्यांना माहित आहे. आम्ही शुद्धीत आहोत. या लोकांची भांग उतरली की हे सरकार जाईल. या राज्याची जनता किती शुद्धीत आहे ते कसब्याच्या निकालाने स्पष्ट झालं आहे. त्यामुळे भांग पिऊन जे सत्तेवर बसले आहेत त्यांना समजेल की महाराष्ट्र आणि राज्याची जनता काय आहे? त्यांची भांग कसब्यात उतरली आहे असे म्हटले आहे.
विरोधक भांग प्यायले असे श्रीमान देवेंद्र फडणवीस म्हणतात… हा सुध्दा नशेचा अतिरेकी आहे.
बांधावर पिकं आडवी झाली… शेतकऱ्यांच्या आयुष्याची धूळधाण झाली आणि सरकार धुळवडीच्या रंगात नाहून निघालं…
ही सत्तेची चढलेली भांग नाहीतर काय? pic.twitter.com/C4n31vYqtw— Sanjay Raut (@rautsanjay61) March 8, 2023
पुढे बोलताना संजय राऊत,”महाराष्ट्रातली जनता भांग पिऊन काहीही करत नाही. कारण भांग पिऊन जनता निर्णय घेत असती तर कसब्यात जो निकाल लागला तो लागला नसता. आम्ही कुठली नशा करत असू तर भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्याची असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
या देशात जे चूक आहे ती चूक दाखवणाऱ्याला देशद्रोही ठरवलं जातं. त्याच्या विरोधात तपास यंत्रणा लावली जाते. नऊ विरोधी नेत्यांनी सरकारला पत्र लिहिलं त्यानंतर लालूप्रसाद यादव यांच्या घरी सीबीआयचे लोक गेले. मनिष सिसोदियांना अटक केली गेली. अशा गोष्टी घडतील. मात्र आम्ही झुकणार नाही असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मला हक्कभंगाची नोटीस मिळाली तेव्हा मी मुंबईत नव्हतो. सोमवार, मंगळवार विधीमंडळाला सुट्टी होती. आता आज मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करतो आणि त्यानंतर काय उत्तर द्यायचं ते ठरवतो असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पण मी कुठेही विधीमंडळाचा अपमान केलेला नाही. एका विशिष्ट गटापुरतंच माझं वक्तव्य मर्यादित आहे. चोरमंडळ हे मी त्या गटाला म्हटलं आहे असेही संजय राऊत म्हणाले आहेत.