पुणे -म्युकरमायकोसिस आजारावरील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या आजारावरील इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. मर्यादित उत्पादन क्षमता तसेच मोजक्याच कंपन्या या आजारावरील इंजेक्शन तयार करत असल्याने देशभरात या इंजेक्शनची कमतरता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर म्युकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शनचे वितरण करण्याची जबाबदारी आता केंद्र शासनाने घेतली आहे. केंद्र शासनकडून राज्य सरकारला या इंजेक्शनचा कोटा मंजुर होणार आहे. त्यानंतर उपलब्ध इंजेक्शनच्या कोट्यानुसार जिल्हानिहाय हे इंजेक्शनचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
म्युकरमायकोसिस या आजारावर शहरात उपचार घेणाऱ्या खासगी रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या विचारात घेतली, तर सुमारे 1 हजार 200 इंजेक्शनची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र शंभर इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. शहरातील खासगी रुग्णांमध्ये सुमारे 25 रुग्णांची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. तर सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची संख्या यापेक्षा वेगळी आहे.
याचा विचार करता रुग्णालयांकडून सध्या दररोज बाराशे इंजेक्शनची मागणी आहेत. प्रत्यक्षात मात्र शंभरच इंजेक्शन जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. रुग्णांलयांनी नोंदणी केलेल्यानुसार प्रत्येक रुग्णालयांना कमी जास्त प्रमाणात ते उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
त्यामुळे बुधवारी देखील शहरात या इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत झाला नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. रुग्णाची आरोग्य स्थिती विचारात घेऊन या इंजेक्शनचा डोस ठरविला जातो. त्यानुसार काही रूग्णांना पाच तर काही रुग्णांना दररोज 10 ते 12 इंजेक्शनचा डोस द्यावा लागत आहे. इंजेक्शनचा डोस कमी पडला अथवा एक दिवस उशीर झाला, तरी रुग्ण गंभीर स्थितीत जाऊ शकतो. परंतु सध्या तुटवडा असल्याने रुग्णांना आवश्यक तेवढे इंजेक्शन उपलब्ध होऊ शकत नाही.