वेल्हे -वेल्हे तालुक्यातील नाभिक समाजाचे संसार उघड्यावर पडले आहेत. हाताला काम नाही, बाहेर मजुरी मिळत नाही. कुटुंब चालवायचं कसं, या चिंतेत नाभिक समाज आहे. सरकारने आता फक्त आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी म्हणजे आम्ही सुटलो, अशा भावना नाभिक समाजाने व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्रामध्ये लॉकडाउन सुरू झाल्यापासून सर्व नाभिक समाजाची दुकाने बंद आहेत. तालुक्यात जवळपास सत्तर ते ऐंशी युवक या व्यवसायावर अवलंबून आहेत. लॉकडाऊन झाल्यापासून हाताला काम नाही, बाहेर कुणाकडे मजुरी नाही. या हातावर घरातली पाच-सहा माणसे अवलंबून आहे.
आता करायचे काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नाभिक समाजाचे वेल्हे तालुका संघटनेचे अध्यक्ष मेघराज सोनवणे असून, सचिव विक्रम सोनवणे आहेत. याबाबत विक्रम सोनवणे यांच्याशी बोलताना त्यांनी आपली खंत व्यक्त केली. विक्रम सोनवणे म्हणाले की, आमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे.
त्यात व्याज वाढत चालले आहे. लॉकडाऊ न आहे; पण बॅंका थांबत नाहीत, वसुली चालूच आहे. घरात खायला सहा माणस आहेत. सरकारने आमची दुकाने चालवायला परवानगी द्यावी किंवा आत्महत्या करायला परवानगी द्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.