प्रकाश आंबेडकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक टीका
सोलापूर (प्रतिनिधी) – जगाचा विचार न करता दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता पाकिस्तानवर हल्ला करावा आणि जनतेने त्यांची केलेली निवड सार्थ ठरवावी, अशी खोचक टीका वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. हल्ला करून पाकिस्तान संपवा असे सांगतानाच ते ज्या मुद्यावर निवडून आले ते मुद्दे पाहता भारताचा पाकिस्तान होईल, असा टोलाही आंबेडकर यांनी लगावला.
गुरुवारी सोलापुरात शासकीय विश्रामधाम येथे पत्रकारांशी ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, देशाला जागतिक विरोधाची दखल घेण्याची गरजच काय? दहशतवादाचा बिमोड करायचा असेल तर पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र असून त्यावर हल्ला केलाच पाहिजे. निवडणुकांच्या पूर्वी आपण तशीच भाषणं केली आहेत. याची मोदींनी आठवण ठेवावी. जागतिक स्तरावर दहशतवाद संपवत आहे. तुम्ही आता भारताला सपोर्ट द्या असे मोदींना सांगता येईल, असे आंबेडकर यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करतानाच मनसेला रोखायचा असेल तर शिवसेनेने स्वतंत्रपणे भूमिका मांडली पाहिजे. 153 मतदारसंघांमध्ये मनसे निवडणूक लढवू शकतो. तसा त्यांना स्पेससुद्धा आहे. मनसे हा सेनेला चांगला पर्याय आहे.