वाल्हे -पुरंदर तालुका तसा दुर्गम भागातच मोडतो. या तालुक्यातील अनेक भाग असे आहेत की, तिथे आजही मोबाइलची रेंज पोहोचलेली नाही. एवढेच काय तर पुरंदरमधील काळदरी खोऱ्यात तर पोलिसांची बिनतारी संदेश यंत्रणा सुद्धा काम करीत नाही.
मग पुरंदर तालुक्यातील ऑनलाइन शिक्षण तरी कसे होणार? राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने मुलांच्या शिक्षणासाठी ऑनलाइन शाळा सुरू केल्या असल्या तरी गावागावांत वीज पोहोचवणाऱ्या सरकारला आजही खेडोपाड्यात मोबाइल नेटवर्क पोहोचवता आले नाही.
त्यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लाससाठी आजही रनावनात डोंगरावर जाऊन ऑनलाइन क्लाससाठी उपस्थितीती लावावी लागत आहे. आधीच लॉकडाऊनमुळे रोजगार बुडालेल्या पालकांनी उसनवार करून स्मार्ट फोन घेतले आहेत;
मात्र पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत रेंज नसल्याने या मोबाइल निरोपयोगी ठरत असल्याने पालकांना मुलांना घेऊन डोंगरदऱ्यात उंचावर जाऊन ऑनलाइन अभ्यास करावा लागत आहे.
खासदार, आमदारांना आश्वासनाचा विसर?
पुरंदर तालुक्यातील अनेक दुर्गम गावात पुढारी जातात तेव्हा तेथील लोक मोबाइल रेंजचा प्रश्न त्यांच्या पुढे मांडतात. त्यावेळेस पुढारी सुधा लवकरच मोबाइल टॉवर उभा करण्याचे आश्वासन देत पण गाव बाहेर पडले की, ते विसरून जातात.
सैनिकांचे गाव असलेल्या पिंगोरी गावालाही बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोबाइल टॉवर उभा करण्याचे आश्वासन दिले होते. आमदार संजय जगताप यांनीही दोन
महिन्यात माझ्या मामाच्या गावात मोबाइल टॉवर सुरू करतो, अशी घोषणा केली होती; पण आता याला दीड वर्षे होत आली तरी या भागात मोबाइल सेवा सुरू झाली नाही.
जीव मुठीत घेऊन…
ज्या लोकांची ऐपत आहे असे लोक खासगी इंटरनेट कनेक्शन घेतात; मात्र ज्यांना दोन वेळचे जेवणाची पंचायत ते पाल्यांना उंच डोंगरावर अभ्यासासाठी पाठवत आहेत. त्याततच या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याने या मुलांना जीव मुठीत धरून रानावनात अभ्यास करावा लागतो आहे.