सासवड -स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील काळा इतिहास म्हणून नोंदल्या जाणाऱ्या आणीबाणीतील अत्याचार आणि दडपशाहीच्या कहाण्या देशातील तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शुक्रवारी(दि. 25) भाजप तर्फे राज्यभर काळा दिवस पाळण्यात येणार असून
या विषयासंदर्भात विविध संवाद कार्यक्रम केले जाणार आहेत त्याचे राज्यभरात संयोजन भारतीय जनता युवा मोर्चा करीत आहे, अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस श्रीकांत ताम्हाणे यांनी गुरुवारी (दि. 24) प्रसार माध्यमांना दिली.
इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 या दिवशी देशात आणीबाणी लागू केली आणि देशभर दमनसत्र सुरू झाले. अत्याचार आणि दडपशाहीमुळे या काळात कॉंग्रेसने सत्तेचा आणि बळाचा अमानुष वापर करून देशभर भयाचे आणि असुरक्षिततेचे सावट निर्माण केले.
25 जून रोजी राज्यात जिल्हा स्तरावर भाजपाच्या वतीने व्हिडिओ कॉन्फरन्स आणि समाजमाध्यमांद्वारे आणीबाणीच्या जखमांच्या जाणीवा समाजास करून देण्यात येतील. आणीबाणीसारखा कडवट काळ देशात पुन्हा कधीच येऊ देणार नाही, असा निर्धार राज्यातील हजारो तरुण, भाजप कार्यकर्ते या दिवशी करतील.