सातारा -करोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये शेतातील माल विक्रीसाठी जात नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये गुंतवून उत्पादित केलेला माल कवडीमोल दराने विकण्याची वेळ आली आहे. या संकटात सापडला असून सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने देशव्यापी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील माल काढण्यासाठी मजूर मिळत नाहीत. काही प्रयत्न करून शेतकऱ्याने माल काढल्यास वाहतूक व विक्री करणे शक्य नसल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी मोठे भांडवल गुंतवून काकडी, कलिंगड, द्राक्षे, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, केळी, हिरवी मिरची व अन्य पालेभाजांची लागवड केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी बॅंका, पतसंस्था, सोसायटीचे कर्ज घेऊन शेतीत गुंतवणूक केली. उन्हाळी हंगामात या पिकांच्या विक्रीतून पैसे मिळवून कर्ज फेडण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले होते. शेतमाल चांगला पिकवला तरी तो कवडीमोल दराने विकावा लागत आहे. त्यातून खर्च केलेला पैसाही वसूल होत नसल्याने कर्जफेडीची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
शेतीतील उत्पादित मालाची विक्री करून शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. शेतकऱ्याने रात्रंदिवस काबाडकष्ट केल्याने शहरातील लोकांना ताजा शेतमाल मिळतो. यावर्षी शेतमाल तयार असूनही लॉकडाऊनमुळे तो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे, असे धैर्यशील अनपट, जिल्हा परिषद सदस्य यांनी सांगितले.
शेतीतील उत्पादित मालाची विक्री करून शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. शेतकऱ्याने रात्रंदिवस काबाडकष्ट केल्याने शहरातील लोकांना ताजा शेतमाल मिळतो. यावर्षी शेतमाल तयार असूनही लॉकडाऊनमुळे तो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. -धैर्यशील अनपट, जि.प. सदस्य