नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील औरैयामधून गावी परतणाऱ्या मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रक एकमेकांसमोर आल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात 23 मजुरांचा मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात कोतवाली परिसरातील मिहौली राष्ट्रीय महामार्गावर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये असलेले सर्व मजूर दिल्लीहून गोरखपूरला जात होते.
लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजुरांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे हे मजूर मिळेल त्या साधनाचा वापर करून आपल्या मूळ गावी परतण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, मजुरांच्या या स्थलांतरादरम्यान, अनेक भीषण अपघात होत आहे. महाराष्ट्रातही काही दिवसांपूर्वी मालगाडीच्या धडकेत मध्यप्रदेशातील मजुरांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, काल उत्तर प्रदेशातील जालोन जिल्ह्यातही मजूर असलेल्या DCM गाडीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून 14 मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
21 labourers dead and several injured after the truck they were travelling in, collided with another truck in Auraiya. The injured have been shifted to hospital. They were coming from Rajasthan. pic.twitter.com/8l0QcH93Su
— ANI UP (@ANINewsUP) May 16, 2020
प्रवासी मजूर मुंबईहून परत येत होते. डीसीएममध्ये एकूण 46 प्रवासी मजूर होते. लॉकडाऊन दरम्यान, हायवेवर हृदय पिळवटून टाकणारं दृश्य पाहायला मिळत आहे. हातात काम नाही आणि खिशात पैसे नाहीत. त्यामुळे अनेक मजूर आपल्या घरी परतण्यासाठी पायी प्रवास करत आहेत.
अनेक मन हेलावणारे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परिस्थिती एवढी गंभीर आहे की, मालवाहू गाड्या, ट्रकमध्ये मजूरांना भरण्यात येत आहे. स्थलांतर करणाऱ्या मजुरांमध्ये बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या मजुरांचा समावेश अधिक आहे. तसेच पंजाब आणि हरियाणामधूनही मजूर हजारो किलोमीटर पायी प्रवास करुन आपल्या घरी परतण्यासाठी धडपडत आहेत.दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले होते की, कोणत्याही प्रवासी मजुरांना असुरक्षित पद्धतीने प्रवास करण्याची परवानगी दिली जाऊ नये. आणि आज हा अपघात घडला.