स्मशानभूमी पाण्याखाली : बहुतेक स्मशानभूमी ओढे व नदीकाठावर
वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील बहुतेक स्मशानभूमी या नदी व ओढ्याकाठी आहे. यावर्षी होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतेक स्मशानभूमी या पाण्याखाली गेल्या आहेत. यामुळे उघड्यावर अंत्यसंस्कार करताना नातेवाईकांची दमछाक होतेय. ओढ्या व नदीकाठी असणाऱ्या स्मशानभूमी उंचावर उभारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मावळ तालुक्यात अंत्यसंस्कार व दशक्रिया विधींचा विचार करता, पूर्वीपासूनच स्मशानभूमी या नदी व ओढ्याकाठी बांधण्यात आल्या आहेत. मावळ तालुक्यातील अनेक गावातील वाड्या व वस्त्यात स्मशानभूमीला जागा उपलब्ध होत नसल्याने मृतदेहावर उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते.
मावळ तालुक्यातील इंद्रायणी, पवना, कुंडलिका, आंद्रा व सुधा आदी नद्यांच्या काठी तसेच ओढ्या काठी स्मशानभूमी बांधण्यात आल्या आहेत. मावळ तालुक्यात सुरु असलेल्या संततधार पावसाने नदी व ओढ्या काठी असलेल्या स्मशानभूमी पाण्याखाली गेल्याने पावसात मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना प्रसंगी अनेक वेळा सरण विझल्याने पुन्हा पावसात चिता पेटविण्याची वेळ आली आहे. कामशेत येथील स्मशानभूमीत उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने मृतदेह जळत असताना, झाडाच्या फांद्या जळाल्या. पावसाळ्यात अत्यंसंस्कार करणे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांसाठी खूपच त्रासदायक काम ठरत आहे.
पाऊस संततधार सुरू असल्याने अग्नि दिलेली चिता अर्ध्यातच विझल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. ग्रामीण भागात तात्पुरते पत्र्याचे शेड उभारावे लागत आहे. नदी व ओढ्यापासून उंचीवर स्मशानभूमी असल्यास पावसाळ्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना गैरसोय होणार नाही. मावळ तालुक्यातील ओढ्या व नदीकाठी असणाऱ्या स्मशानभूमी उंचावर उभारण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अतुल वायकर, संतोष भिलारे, हरीश दानवे, सोमा भेगडे, शरद मोरे, सुरेश कोंढरे, युवराज शिंदे व नागरिकांनी केली.