आठवलेंचा राज ठाकरेंना सुद्धा सल्ला
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाअधिवेशन काल मुंबईत पार पडले. यावेळी राजकारणाला कलाटणी देणारे काही विषय चर्चेत आले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या नवीन भगव्या ध्वजाचे अनावरण केले. तसेच राजपुत्र अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली. दरम्यान समारोपीय भाषणात राज ठाकरे यांनी पक्षाची नवीन भूमिका स्पष्ट केली.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना सल्ला दिला आहे. “झेंड्याचा रंग बदलण्यापेक्षा मन बदलावं. झेंड्याचा रंग बदलून भगवा केल्याने फायदा होणार नाही. झेंड्याचा रंग बदलण्यापेक्षा मन बदललं पाहिजे आणि आपली भूमिका बदलली पाहिजे. त्यांनी भारतीय संविधानात असलेली भूमिका घेतली पाहिजे”
तसेच रामदास आठवले यांनी राज ठाकरेंनी बदललेल्या धोरणामुळे शिवसेनेची कोंडी होणार असल्याचे स्पष्ट केले. प्रखर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला मिळणारी मते कदाचित मनसेला मिळू शकतात. अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेना-भाजप-रिपाइं सरकार बनवू शकते, असा विश्वास सुद्धा आठवलेंनी व्यक्त केला.