श्रीनगर, दि.6 –दक्षिण काश्मीरमध्ये गुरूवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्या चकमकीवेळी एक दहशतवादी शरण आला.
शोपियॉं जिल्ह्यात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली. दहशतवादी दडलेल्या ठिकाणाला सुरक्षा जवानांनी हेरले. दहशतवादी स्थानिक रहिवासी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी त्यांना शरण येण्याचे आवाहन केले.
दहशतवाद्यांचे मन वळवण्यासाठी त्यांच्या कुटूंबीयांनाही चकमकस्थळी पाचारण करण्यात आले. काही कालावधीनंतर शस्त्रास्त्रांचा त्याग करून एक दहशतवादी सुरक्षा दलांपुढे शरण आला. त्यानेही तीन साथीदारांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, ते धुडकावत दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये तीन दहशतवादी मारले गेले.
ते अल्-बद्र या संघटनेचे सदस्य होते. त्यांचा खात्मा सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे. संबंधित मोहिमेवेळी सुरक्षा दलांनी संयम दाखवल्याने दहशतवादाच्या मार्गावर भरकटलेला एक तरूण पुन्हा मुख्य प्रवाहात सामील झाला.