चंदिगढ – पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील धारीवाल भागात एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती, पत्नी आणि मुलगी यांनी सल्फासच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी गुरदासपूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. आत्महत्या करण्याआधी ते सोशल मीडियावर लाईव्ह आले होते. मृत्यूसाठी त्यांनी 9 जणांना जबाबदार ठरवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नरेश कुमार (वय 42), भारती शर्मा (वय 38) आणि त्यांची मुलगी मानसी (वय 16) रा. धारिवाल यांनी काल रात्री राहत्या घरी सल्फासच्या गोळ्या खावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी भारती यांनी एक व्हिडिओ बनविला होता. यात त्यांनी त्यांच्या मृत्यूसाठी त्यांचा भाऊ आणि इतर काही लोकांना दोषी ठरविले आहे.
स्वत: आपल्या भावाने सल्फासच्या गोळ्या पाठवल्या आहेत आणि आत्महत्या करण्याचा सल्ला दिला आहे. या व्हिडिओनंतरही आम्हाला न्याय मिळण्याची कोणतीही आशा नाही, परंतु लोक त्याच्या तावडीत अडकू नयेत अशी इच्छा आहे, जेणेकरून इतर कोणावरही आमच्यासारखे पाऊल उचलण्याची वेळ येऊ नये, असे त्यांनी केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.
नरेशकुमार धारीवाल हे शहरातच ऊसाचा रस विकत असत. घटनेची माहिती मिळताच एसएसपी राजिंदरसिंग सोहल घटनास्थळी पोहोचले. मुलगा कुणाल यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी प्रदीप पैसे न दिल्याबद्दल कुटुंबाला त्रास देत असे.