नवी दिल्ली – एका व्यक्तीने आपली पत्नी आणि तीन मुलींना शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या कुदळीने ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यात ही थरारक घटना घडली.यानंतर हत्येमागचे अजब कारण समोर आल्याने पोलिसांच्या देखील पाया खालची जमीन सरकली आहे.
जांजगीर-चंपाचे पोलिस अधीक्षक विजय अग्रवाल यांनी सांगितले की, ही घटना 31 जुलै रोजी रात्री पंतोरा पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या देवरी गावात घडली, परंतु बुधवारी हे उघडकीस आली. त्यानंतर संशयित देशराज कश्यप याला अटक करण्यात आली आहे.कश्यपची पत्नी मोंगराबाई (४०) आणि त्यांच्या मुली पूजा उर्फ कल्याणी (१६), भाग्य लक्ष्मी (१०) आणि यचना (६) अशी मृतांची नावे आहेत, असे त्यांनी सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार, कश्यप हा मानसिक आरोग्याच्या समस्येने त्रस्त होता आणि गेल्या 10 वर्षांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. अशी माहिती पोलिसांना समजताच त्यांनाही आश्चर्य वाटले. शेजारच्या बिलासपूर जिल्ह्यातील डॉक्टरांना भेटून कश्यप 31 जुलै रोजी घरी परतले. त्याच रात्री, त्याने कथितपणे पत्नी आणि तीन मुलींना कुदळीने ठार मारले आणि गेट बाहेरून कुलूप लावून घर सोडले अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.कश्यप यांनी मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे असे कृत्य केले कि यामागे दुसरे काही कारण होते याचा शोध पोलीस घेत आहेत.
दोन दिवसांपासून घरामध्ये कोणीही दिसत नसताना काहीतरी गडबड झाल्याचा संशय आल्याने गावप्रमुखाने बुधवारी पोलिसांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पोलिसांना घरात चार मृतदेह सापडले आणि ते पोस्टमार्टमसाठी पाठवले.या हत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून कश्यपविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.