नवी दिल्ली – टिहरी गढवाल जिल्ह्यातील गंगा नदीत दरड कोसळून भूस्खलन झाले. या दुर्घटनेत एक प्रवासी वाहन सापडून त्यातील तीन जण ठार झाले असून अन्य तीन जण बेपत्ता झाले आहेत. ऋषिकेशमध्ये झालेल्या या अपघाताने एकच खळबळ उडाली आहे.
या वाहनात चालकासह 11 लोक होते, त्यापैकी पाच जणांना वाचवण्यात आले आणि त्यांना ऋषिकेश येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते केदारनाथहून ऋषिकेशला जात होते.राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले असून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.
नदीतून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेत सापडलेले नागरीक दिल्ली, बिहार आणि हैदराबाद येथील रहिवासी आहेत. ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील मुनी की रेती परिसरात हा अपघात झाला. दरड कोसळल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ते रस्त्यावरून घसरले आणि गंगा नदीत पडले.