चेन्नई – रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा रंग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता वंदे भारत रेल्वेचा रंग निळ्याऐवजी भगवा असेल. नवा रंग तिरंग्यापासून प्रेरित असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यांवेळी म्हटले आहे. याशिवाय वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवासी आणि तज्ज्ञांनी सूचना केल्याप्रमाणे 25 किरकोळ बदलही करण्यात आले आहेत.
सध्या देशभरात 25 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. 2 गाड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 28व्या ट्रेनला प्रायोगिक तत्त्वावर भगवा रंग देण्यात आला आहे. ही ट्रेन सध्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये ठेवण्यात आली आहे.
वंदे भारत एक्सप्रेसच्या सर्व गाड्या या कारखान्यात बनतात. अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी कारखान्याची पाहणी करताना दक्षिण रेल्वेच्या सुरक्षा उपायांचाही त्यांनी आढावा घेतला.
“रेल्वे आरक्षणाशिवाय प्रवाशांसाठी अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह डबे बनविण्याचे काम करत आहे. याशिवाय अल्प उत्पन्न गटातील लोकही चांगल्या दर्जाच्या आणि आरामदायक, सुरक्षित ट्रेनमध्ये प्रवास करू शकतील,’ असेही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितले.
“वंदे भारत’मधील काही बदल
– सीटमध्ये उत्तम कुशन बसवण्यात आले असून त्याचा कोनही निश्चित करण्यात आला आहे.
– मोबाईल चार्जिंग पॉईंट्स सुधारित करण्यात आले आहेत.
– एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये फूट रेस्ट वाढवण्यात आला आहे.
– वॉश बेसिनची खोली वाढवण्यात आली आहे, जेणेकरून पाणी बाजूला उडणार नाही.
– स्वच्छतागृहांमध्ये उत्तम प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे.
– रीडिंग लाइटही सुधारला गेला आहे.