औरंगाबाद – पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शरणापूर शिवारात घडली. प्रतिक आनंद भिसे (15) तिरुपती मारोती इंदलकर (15) शिवराज संजय पवार (17) अशी मृत्यू पावलेल्या तिघांची नावे आहे. आज दुपारी अग्निशमन दलाच्या जवानांनी या तिघांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेमुळे शरणापूर परिसरावर शोककळा पसरली आहे. पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्यामुळे मुलांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शरणापूर शिवारात भांगसी गड पायथ्याशी नारायण वाघमारे यांचे शेततळे आहे. या तळ्यावर फिरण्यासाठी ही मुले गेली होती. तळ्यावर पोहोचल्यावर ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. शिवारात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अग्निशामक दलाने या मुलांचे मृतदेह बाहेर काढले, त्यानंतर अवघा गाव सुन्न झाला.