अवसरी खुर्दच्या आठवडे बाजारात तरीही ग्राहक नाहीच
मंचर – आंबेगाव तालुक्यात सुमारे 6 लाख 60 हजार ब्रॉयलर कोंबड्या विकण्यायोग्य तयार झाल्या असून त्यांना ग्राहक नसल्याने पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे. अवसरी खुर्द येथील गुरुवारच्या आठवडे बाजारात 50 रुपयांत तीन ब्रॉयलर कोंबड्याची विक्री करण्यात आली; परंतु स्वस्त दराने कोंबड्या देऊनही ग्राहकांकडून मागणी नसल्याचे दिसून आले. मांसाहाराबाबत करोना व्हायरस धोक्याचा असल्याच्या समाज माध्यमांवरील अफवेने कोंबडी व्यवसायाला मोठा फटका
बसत आहे.
करोना व्हायरसचा धसका चिकन खवय्यांनी मोठ्या प्रमाणात घेतल्याने ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपन करणारे शेतकरी आणि कंपन्या मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडल्या आहे. ब्रॉयलर कोंबड्यांची साधारण 35 ते 45 दिवसांत 1800 ग्रॅम ते 2200 ग्रॅम दरम्यान कोंबडी विकण्यायोग्य तयार होती.
70 ते 80 रुपये किलो दराने ग्राहक कोंबडी खरेदी करतात. एका किलोमागे कोंबडी व्यवस्थापन करणारे पोल्ट्रीचालक किंवा कंपन्या यांना खर्च वजा जाता 15 ते 20 रुपये मिळतात; परंतु चीनमध्ये करोना व्हायरसची लागण झाल्याने ब्रॉयलर कोंबडी उत्पादक आणि कंपन्या धास्तावले आहेत. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
चिकनला खवय्यांचा नकार
करोना आणि ब्रॉयलर कोंबड्यांचा कोणताही संबध नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट करूनही धास्तावलेले नागरिक चिकन खाण्यास तयार नाही. चिकनला मागणी नसल्याने पोल्ट्रीशेडमध्ये साधारण 50 ते 60 दिवसांच्या तीन किलो वजनाचा ब्रॉयलर पक्षी तयार झाला; परंतु ग्राहक नसल्याने कोंबडी उत्पादक शेतकरी आणि कंपन्यांनी आठवडे बाजारात गाड्या लावून कोंबड्या कवडीमोल भावाने विकण्याचा धडाका लावला.
दोन ते तीन किलोची कोंबडी तयार होण्यासाठी साधारण 100 ते 120 रुपये खर्च येतो; परंतु सद्यःस्थितीत 50 रुपयांना तीन कोंबड्या विकल्या जात आहेत.
-प्रमोद हिंगे, पोल्ट्रीमालक
नागरिकांनी चिकन खावे. करोना व्हायरस आणि चिकनचा कोणताही संबध नाही.
– शफीभाई मोमीन,
आंबेगाव ऍग्रोचे मालक
मंचर,घोडेगाव,अवसरी खुर्द, पारगांव येथील आठवडे बाजारात गाडीमध्ये कोंबड्या आणून कवडीमोल भावाने विकल्या जात आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायास शेकडो कोटी रुपयांचा तोटा होत आहे.
– विजय शिंदे, पोल्ट्रीचालक, अवसरी खुर्द
आंबेगाव तालुक्यात सुमारे 6 लाख 60 हजार ब्रॉयलर कोंबड्या विकण्यायोग्य तयार झाल्या असून त्यांना ग्राहक नसल्याने पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे.
-डॉ. रंगनाथ चासकर, मंचर